मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपात २०१९ चे निकाल हा आधार होऊ शकत नाही अन् निकषदेखील नाही.अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी आजच्या बैठकीत मांडली.एखाद्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्या म्हणजे पाच वर्षानंतर संबंधित पक्षाची परिस्थिती तशीच राहत नाही. त्यामुळे पक्षसंघटन आणि स्थानिक परिस्थिती पाहूनच जागावाटप व्हावे असा सूर या नेत्यांनी आवळला. आजपासून काँग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरूवात केली. प्रत्येक मतदारसंघातील सद्य:स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ज्या मतदारसंघात पक्षाची स्थिती कमकुवत आहे, तिथे दौरे काढून पक्षसंघटन मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.
रम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही २०१९ चे निकाल हा जागावाटपाचा निकष होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, NCP बरोबर काँग्रेसची आघाडी आधीपासून आहे. पण आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय महत्त्वाचा आहे. २०१९ ची परिस्थिती व आत्ताची परिस्थिती यात फरक आहे.एखाद्या निवडणुकीत जागा कमी जिंकल्या म्हणजे तीच परिस्थिती कायम राहत नसते. ती बदलत असते. सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घेतला जाईल. तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपचा पराभव करणे कठीण नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. आम्ही एकत्र राहून भाजपला पराभूत करू, असा इशाराही चव्हाण यांनी यावेळी दिला.दरम्यान, या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक ताकद आहे. काँग्रेस सर्व मतदारसंघांचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या जागा वाटपावर काही परिणाम होणार नाही. भाजपचा पराभव करणे हेच आमचे लक्ष्य असून या बैठकीनंतर मविआच्या बैठकीत पुढची रणनीती निश्चित केली जाईल.
राष्ट्रवादी रामटेकवर दावा सांगणार?
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रामटेक लोकसभा मतदारसंघावर दावा केला जाणार आहे. या संदर्भात सोमवारी (ता.५) मुंबई येथे आयोजित बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांना सर्व डेटा घेऊन बोलाविण्यात आले आहे. या जागेवरून दोन्ही CONGRESS बिनसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पूर्व विदर्भात राष्ट्रवादी काँग्रसचा एकही खासदार नाही. गोंदिया-बुलडाण्यात माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यापूर्वी निवडून आले होते. प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर आहेत. ते या जागेवर दावा करण्याची दाट शक्यता आहे. पटोले याच जिल्ह्याचे असल्याने ते सहजासहजी ही जागा सोडणार नाहीत. त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून रामटेक लोकसभा जागेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केली जाणार आहे.रामटेक लोकसभेमधील काटोल-नरखेड आणि हिंगणा असे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. काटोलमध्ये अनिल देशमुख यांचे वर्चस्व आहे. माजी मंत्री रमेश बंग, काही जिल्हा परिषद सदस्यही या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे इतर जागांच्या तुलनेत रामटेक लढणे सोयीचे असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघ मिळावा, याकरिता ही राष्ट्रवादीची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.