कर्नाटकातील होस्पेटजवळील दोट्टीहाळ गावाजवळ रविवारी सकाळी भरधाव ट्रकने कारला धडक दिली.कर्नाटकातील होस्पेटजवळील दोट्टीहाळ गावाजवळ रविवारी सकाळी (२८ मे २०२३) ट्रक आणि कार यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात दोन चिमुकल्यांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बंगळुरूकडे पती पत्नी आणि त्यांची दोन मुले कारने निघाले होते. त्यांच्यासोबत इंडी तालुक्यातील नंद्राळ गावचे दोन नातेवाईकही होते. या सहाही जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
राघवेंद्र सुभाष कांबळे (वय वर्षे २५), जानू राघवेंद्र कांबळे (वय वर्षे २३), राकेश राघवेंद्र कांबळे (वय वर्षे ५) व रश्मिका राघवेंद्र कांबळे (वय वर्षे २) सर्वजण राहणार लवंगी (ता.दक्षिण सोलापूर) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तसेच इंडी तालुक्यातील नंद्राळ गावच्या त्यांच्या दोन नातेवाईकांचाही यात मृत्यू झाला आहे.लवंगी येथे यल्लम्मा देवीची यात्रा होती. त्यानिमित्ताने कांबळे परिवार गावाकडे आले होते. कांबळं दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह बंगळुरुकडे जात होते. यावेळी त्यांनी इंडी तालुक्यातील नंद्राळ गावच्या दोघा नातेवाईकांनाही सोबत घेतले. परंतु, कर्नाटकमधील होस्पेटजवळील दोट्टीहाळ येथे भरधाव ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.