• Sun. May 4th, 2025

समीर वानखेडेंनी मोठ्या टेचात ते वाक्य उच्चारलं, अवघ्या काही दिवसांत ग्रह फिरले; ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Byjantaadmin

May 18, 2023

वाशिम: आपल्या देशातील लोक एखादी गोष्ट अनेकदा भावनिकतेच्या दृष्टीकोनातून पाहतात. त्यामुळे ही जनता एखाद्याला अगदी डोक्यावर बसवते, पण वेळ आल्यास तिच जनता त्या व्यक्तीला तितक्याच वेगाने खालीही आपटते. याचाच अनुभव सध्या समीर वानखेडे यांच्या बाबतीतही येतोय. समीर वानखेडे एक वादग्रस्त आय.आर.एस.अधिकारी. कुणाच्या लेखी ते देशाला नशामुक्त करण्यासाठी झटणारे देशभक्त तर कुणासाठी खोट्या कारवाया करून करोडोंची खंडणी वसुलणारे खंडणीखोर.

समीर वानखेडे एन.सी.बी. मध्ये कार्यरत असतांना त्यांनी बॉलीवूड मधल्या बड्या कलाकारांवर कारवाई करून नशामुक्तीची चळवळ चालवली होती. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. पण हीच कारवाई त्यांच्यासाठी अडचणीची ठरली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर वेगवेगळे आरोप लावले. त्यावेळी याकडे राजकीय आरोप म्हणून बघितले गेले आणि समीर वानखेडे यांच्या बाजूने भावनिक वातावरण तयार करत ड्रग्समुक्त भारत करू इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत असे सांगून त्यांना सहानुभूती देण्यात आली. याच वेळी त्यांचे मूळ गाव असलेल्या वाशिम जिल्ह्यातही वानखेडेंच्या समर्थनार्थ मोठे मोर्चे काढले गेले. अनेक सामजिक, राजकीय संघटना त्यांच्या बाजुने रस्त्याला उतरल्या,सोशल मीडियावर मोठे कॅम्पेन केले गेले आणि ते जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून हिरो ठरले.

Sameer Wankhede (2)

यानंतर समीर वानखेडे यांच्या वाशिम जिल्ह्यातील फेऱ्या वाढल्या. असं म्हणतात की त्यांना जिल्ह्यात राजकीय भविष्यही दिसत होते. त्यातूनच त्यांनी जिल्ह्यात अनेक सामजिक कार्यक्रमात उपस्थिती वाढवली. ८ मे रोजी त्यांनी असाच एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. आदर्श शिंदे यांच्या गीतांचा. या कार्यक्रमला किमान ५० हजार लोक आल्याचे बोलल्या जाते. इथे बोलताना समीर वानखेडे हे लोकांना उद्देशून म्हणाले होते की, काही लोक मला विचारतात तुमचे गाव कुठे आहे. तुमचे लोक कुठे आहेत त्यांना मी सांगतो; बघा हे आहेत माझे लोक, जे संकटाच्या वेळी माझ्या मगे उभे राहिले. पण माझ्यावर आरोप करणारे आता कुठे आहेत? जेलमध्ये …! या कार्यक्रमात समीर वानखेडेसाठी जमलेले हजारो लोक त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होते.

जिल्ह्यातील एक तरुण इतका मोठा अधिकारी आहे याचे त्यांना कौतुक वाटत होते. पण या कार्यक्रमानंतर अवघ्या आठ दिवसात त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दखल झाला, सीबीआय ने त्यांच्या घरावर धाड टाकली, त्यांची चौकशी सुरू झाली. एका देशभक्ताला फसवले जातेय म्हणत पुन्हा वाशिम जिल्ह्यात त्यांच्या समर्थनार्थ मोर्चाची हाक देण्यात आली. गाण्याच्या कार्यक्रमाला जमलेले हजारो लोक या मोर्चातही सहभागी होतील असा आयोजकांचा कयास होता पण तो खोटा ठरला. मोर्चासाठी वानखेडे यांचे २०-२५ नातेवाईक सोडले तर कुणीही नव्हते. मोर्चात ना त्यांच्या गावाचे लोक होते, ना समाजाचे.

ज्या लोकांनी त्यांना देशभक्त म्हणत आठ दिवसांपूर्वी डोक्यावर घेतलं होतं, त्यांचा उदोउदो केला होता आज आरोप झाल्यानतर ते कुठेच दिसत नव्हते. अवघ्या आठ दिवसांपूर्वीचा लोकांचा नायक आता खलनायक तर झाला नाही ना याचीच सध्या चर्चा होतेय. समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने २२ तारखेपर्ंयत कोणत्याही कारवाईपासून संरक्षण देत तात्पुरता दिलासा दिला आहे. वानखडे आता जातीचे कार्ड खेळत आपण दलित असल्याने आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचे सांगत आहेत. तसेच एन.सी.बी.चे अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *