निवडणुका येतात तेव्हाच भाजप हिजाब प्रकरण काढतो, द कश्मीर फाइल्स आणि द केरला स्टोरी असे चित्रपट प्रदर्शित केले जातात, धार्मिक विषयावर राजकारण केले जाते, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
भाजपला महिलांची काळजी असेल तर मागील पाच वर्षांत गुजरातमधून ४० हजारांवर महिला-मुली बेपत्ता झाल्या आहेत, महाराष्ट्रातून १८ ते २५ वयाच्या सरासरी ७० मुली रोज बेपत्ता होत आहेत, त्यावर त्यांनी चित्रपट काढावा, असा सल्ला त्यांनी भाजपला दिला.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, ११ मे रोजी नितीन बानगुडे पाटील यांचे नक्षत्रवाडी व बजाजनगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान होणार आहे. १३ मे रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यार्थ्यांना ‘गरुडझेप’ हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे.