कुणाच्या उत्तरत्रिकेत पान फाटलेले, तर कुणाच्या खाणाखुणा, कुठे मोबाइल क्रमांक लिहून प्लीज पास करा, देवा मला पास कर, असा मजकूर लिहून एवढ्यावच न थांबता काही विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांमध्ये चक्क पुष्पा… झुकेगा नहीं साला… हा चित्रपटातील डायलॉग लिहिल्याचा प्रकार समाेर अाला अाहे.
त्यामुळे मंगळवारपासून आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुनावणीदरम्यान उत्तरपत्रिकेच्या शेवटी आणि मध्येच चक्क कर्सिव्ह रायटिंगमध्ये उत्तर लिहिल्याचेही दिसून आले. परंतु, हे आमचे अक्षर नाही, उत्तरपत्रिकेत कसे आले हे अाम्हाला माहिती नाही, असे उत्तर बुधवारी विभागीय मंडळाच्या विद्यार्थी सुनावणीदरम्यान समाेर अाले.
आता १३ मेपर्यंत झालेल्या सुनावणीनंतर तदर्थ समितीसमोेर अहवाल ठेवून पुढील निर्णय घेणार असल्याचे विभागीय शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, उत्तरपत्रिकेतील आक्षेपार्ह लेखनावरील सुनावणी हा नियमित भाग असल्याचा पवित्राही त्यांनी घेतला. मात्र, उत्तरपत्रिकेत अक्षरबदल झाले कसे हे अद्यापही समजू शकले नाही.
त्यामुळे मॉडरेटरमुळे उघडकीस आलेल्या या प्रकारावर आता उत्तरपत्रिका तपासणारे शिक्षक, केंद्र संचालक, मॉडरेटर यांचीदेखील चौकशी होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या विद्यार्थ्यांची १३ मेपर्यंत सुनावणी करण्यात येत आहे.
यात ९ मे रोजी अंबाजोगाई, पैठण, केज येथील काही मुलांच्या उत्तरपत्रिकेत हस्ताक्षर बदल असल्याचे आढळून आल्याने त्यांना सुनावणीसाठी बोलावल्याने खळबळ उडाली, तर बुधवारी पुन्हा या प्रकारात ७४ जणांना सुनावणीसाठी बोलवले होते. त्यापैकी ७१ जण उपस्थित हाेते. आक्षेपार्ह लेखन करणाऱ्यांची एकूण संख्या ५०० आहे. या मुलांच्या
सुनावणीवरून नेमका प्रकार कुठे, का आणि कुणी केला, याचा शोध घेणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र, विद्यार्थ्यांच्या मते, यात आम्ही दोषी नाही, कुणी लिहिले माहीत नाही, आम्ही तर कर्सिव्ह लिहीत नाही, अशी उत्तरे विद्यार्थ्यांनी या वेळी दिली. त्यामुळे आता हा प्रकार कसा झाला याचे उत्तर विभागीय मंडळाकडून शोधले जात आहे.
असा होतो उत्तरपत्रिका पाठवण्याचा प्रवास
केंद्रावर पेपर झाल्यानंतर केंद्र संचालक सर्व उत्तरपत्रिकांची नोंद घेऊन त्या मोजून कस्टोडियनकडे पाठवतो. त्यानंतर मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे उत्तरपत्रिका जाऊन ते तपासणीसाठी शिक्षकांना देतात. शिक्षकांकडून तपासणी झाल्यावर पुन्हा मॉडरेटरकडून बोर्डाकडे उत्तरपत्रिका येतात.
अशी होते विद्यार्थी सुनावणी
हा पेपर तुमचा आहे का? यातील हस्ताक्षर तुमचे आहे की नाही?, तुम्ही आक्षेपार्ह लेखन केले काॽ पान फाडले आहे का? तुमच्यासोबत पालक आले आहेत की नाही ? तुम्हाला गुन्हा मान्य आहे का नाही? असे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचे मत नोंदवले जात आहे.
असा होतो उत्तरपत्रिका पाठवण्याचा प्रवास केंद्रावर पेपर झाल्यानंतर केंद्र संचालक सर्व उत्तरपत्रिकांची नोंद घेऊन त्या मोजून कस्टोडियनकडे पाठवतो. त्यानंतर मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे उत्तरपत्रिका जाऊन ते तपासणीसाठी शिक्षकांना देतात. शिक्षकांकडून तपासणी झाल्यावर पुन्हा मॉडरेटरकडून बोर्डाकडे उत्तरपत्रिका येतात.