दिल्लीमधील अतिरिक्त सत्र न्यायालयात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा आज (२९ एप्रिल)अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.एकीकडे आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे राज्यात लव्ह जिहाद विरुद्ध कायदा अंमलात आणण्याचीही मागणीही जोर धरु लागली आहे.
विशेष म्हणजे, राज्यात लव्ह जिहाद, धर्मांतर आणि लँड जिहादविरोधी कायदा पूर्ण देशभर लागू करण्यासाठी अॅड.निरंजन डावखरे यांनी हिंदू जनजागरण धर्मसभेचे आयोजन केलं आहे.अॅड. डावखरे यांच्या या कार्यक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे.श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा आरोपी आफताब हा मुस्लिम नसून पारसी असल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. तसेच, लव्ह जिहाद सारखी कुठलेतरी कारण काढून धार्मिक तेठ निर्माण करु नये, यामुळे देशाचं नुकसान होतंय, असा सल्लाही आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.याचवेळी त्यांनी निरंजन डावखरेंच्या सभेवरही निशाणा साधला आहे.
वाचा, काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये
आफताब आणि श्रद्धा वालकर या प्रकरणामध्ये शंभर टक्के आफताबला फाशी झालीच पाहीजे. पण, आफताब या नावाखाली गैरसमज पसरवणा-यांना मला एवढेच सांगायचे आहे की, आफताब हा पारसी आहे. ज्या उद्देशाने त्याचे नाव घेतले जाते, तो उद्देश हिनमनोवृत्ती दाखवणारा आहे. तसेच जर कुठेही लव जिहाद सारखी प्रकरणं असतील तर आम्ही तुमच्याबरोबर उभे राहू. मला नाही वाटत ठाण्यात एकही प्रकरण लव जिहाद’चे झाले आहे.
ठाण्यात काही पोस्टर्स लागली आहेत. ती पोस्टर्स वाचल्यानंतर असे वाटते की, हिंदू धर्मातील महिला भगिनींना सद्सदविवेक बुद्धीच नाही आणि त्या कधिही जाळ्यात फसू शकतात. मला यामध्ये कुठेही सत्यता वाटत नाही. माझ्या हिंदू भगिनी अत्यंत हुशार आहेत. त्यांची सद्सदविवेक बुद्धी जागृत आहे आणि आपल्या आयुष्याचं पुढे काय करायचं हा निकाल घेण्यासाठी त्या खूप समर्थ आहेत. त्यांच्या सामर्थ्याला कमी लेखू नका आणि ही पुरुषप्रधान संस्कृती त्यांच्यावर लादू नका.
जगातील सर्व धर्मातील महिला या शंभर वर्षांपूर्वी कश्या होत्या आणि शंभर वर्षांनंतर कश्या आहेत हे आपण जाणून आहोत. तेव्हा कुठल्याही वर्णाला, कुठल्याही वर्गाला तसेच स्त्री-पुरुषामध्ये भेदभाव न करता आपण सगळे सामान आहोत आणि बुद्धीजीवी आहोत एवढं लक्षात ठेवा. निरंजन.डावखरे ह्यानी एका मुस्लिम भगिनीशी विवाह केला आहे हे सामंजस्य वाढीला लागावे हीच इच्छा. हा कार्येक्रम नवपाड्यात न घेता डायघर ला का घेतला हे कोडे काही सुटत नाही. ”