जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान या सभेवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर याचवेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. आगामी 15 दिवसांत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर या सरकारचं ‘डेथ वॉरंट’ निघाले असल्याचं राऊत म्हणाले आहे. राऊत यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
दरम्यान यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचं जे काही राज्य आहे, ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही, असे राऊत म्हणाले. तर मी मागे देखील एकदा म्हणालो होतो की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही, या सरकारचा ‘डेथ वॉरंट’ निघालेलं आहे. आता सही कोणी आणि कधी करायची हे ठरलं, असल्याचं राऊत म्हणाले आहे.