खारघरमध्ये घडलेली श्री सेवकांच्या मृत्यूची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र या घटनेत किती श्री सेवकांचे मृत्यू झाले ती संख्या का लपवली जाते आहे? सरकार कुठल्या कलेक्टरला आणि कंत्राटदाराला पाठिशी घालतं आहे? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. जे काही घडलं त्यामध्ये राजकारण करण्याचा विषय नाही. मात्र हे सगळं कुणाला वाचवण्याच्या प्रयत्नात होतं आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी?
खारघरमध्ये जो कार्यक्रम झाला तिथे शून्य नियोजन होतं. या सगळ्याचं कंत्राट कुणाला दिलं होतं? महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारींना दिला ते योग्यच आहे. पण सरकारने जे नियोजन केलं आणि जे कंत्राट दिलं ती व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या जवळची होती का? याची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी आदित्य ठाकरेंनी केली. कलेक्टर असो किंवा कंत्राटदार असो चौकशी झाली पाहिजे. तसंच मृतांची संख्या का लपवली जाते आहे ? हा प्रश्न उपस्थित होतोच आहे. त्याचं उत्तर मिळालं पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
नेमकं हे प्रकरण काय आहे?
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी ( १६ एप्रिल ) ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गृहमंत्री AMIT SHAHयांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी CM EKNATH SHINDE उपमुख्यमंत्री यांच्यासह सरकारमधील मंत्री उपस्थित होते. पण, या कार्यक्रमाला गालबोट लागलं. नवी मुंबईतल्या खारघर या ठिकाणी असलेल्या मैदानावर झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमाला धर्मधिकारी यांचे लाखो अनुयायी दाखल झाले होते. हा कार्यक्रम भर दुपारी ठेवण्यात आला होता. त्यावेळचं तापमान ४२ अंश सेल्सियस होते. या तापमानामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरु होते.
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला
महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता नेमकी कुठून सुरू झाली? ज्या व्यक्तीला माणुसकीच्या नात्याने आम्ही सगळं दिलं. त्याच व्यक्तीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगून एक व्यक्ती मुख्यमंत्री होते. टेबलवर चढून नाचतात, रावणराज राज्यात सुरू आहे. जे आमचे नाही झाले उद्धवसाहेबांचे नाही झाले ते भाजपाचे काय होणार? असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पुन्हा टोला लगावला आहे. कटुता कुठल्याच राजकीय पक्षांमध्ये नाही. देवेंद्रजी आणि आमच्यातही कटुता नाही. मात्र जे लोक माणुसकी सोडून वागतात त्यांच्याविषयी काहीतरी मॅन्युअल आलं पाहिजे.DEVENDRA FADNVIS आणि आमच्यात वैचारिक मतभेद हे हिंदुत्वावरून आहेत. त्यांच्या हिंदुत्वात लोकांना जाळणं, मॉब लिंचिंग आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं. पण वैचारिक मतभेद २०१४ मध्येही नव्हते तेव्हा त्यांनी युती तोडली होती असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.