शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (16 एप्रिल) महाराष्ट्रातील नागपुरात महाविकास आघाडी (MVA) युतीच्या ‘वज्रमुठ’ मेळाव्याला संबोधित करताना भाजप-RSS आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी हिंडनबर्ग आणि जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या खुलाशांवरुन केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
हिंडेनबर्ग अहवाल फालतू आहे तर एवढे का हादरलात, असा सवाल करतच उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. हिंडेनबर्गने एक अहवाल दाखल केल्यावर तो जणू काही देशवरचा हल्ला आहे असं भासवलं गेल. मग हा जर देशावरचा हल्ला आहे तर त्याची उत्तरं सर्वात आधी देशाला मिळायला नकोत का, हिंडेनबर्गमध्ये ज्याच्यावर आरोप केलेत तो (उद्योगपती गौतम अदानी) मोकळा फिरतोय. पण काँग्रेस नेते राहुल गांधींना मात्र त्यांनी अपात्र ठरवलं, त्यांना घरातून बाहेर काढलं. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आत टाकतील. मग आता आम्ही प्रश्नही विचारायचे नाहीत. हिंडेनबर्ग अहवाल अनावश्यक आहे, मग जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर का दिले नाही? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
आमचं हिंदुत्व हे शेंडी, जानव्याचं हिंदुत्व नाही. त्यांचे हिंदुत्व हे गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. भाजपने त्यांचं हिंदुत्व काय आहे हे सांगावं, काँग्रेसमध्ये हिंदू नाहीत का? संभाजीनगरच्या सभेनंतर यांनी गोमूत्र शिंपडले. तिथे आलेली लोक काय माणसे नव्हती? गोमुत्र शिंपडल्यानंतर त्यांनी ते थोडसं प्यायलाही हवं होतं. थोडे समजदार झाले असते, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरेंनी त्यांना लगावला. याचवेळी त्यांनी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मशिदीत जाण्याच्या मुद्द्यावरुनही निशाणा साधाला, मोहन भागवत मशिदीत गेले मी गेलो असतो तर काय केलं असतं भाजपने.
आम्ही मैदानात आलो. तुम्हीही मैदानात या. तुमचा कोण बाप निवडायचा आहे तो निवडा. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने निवडणुकीच्या मैदानात उतरतो. असे खुलं आव्हानी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले. तसेच, रोशनी शिंदेवर हल्ला केला. उपचारादरम्यानच तिला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला. गृहमंत्र्यांना फडतूस नाही तर आणखी काय शब्द वापरावा? असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ही काय लोकशाहीची दहिहंडी आहे का.दिसली हंडी की फोड. विरोधकांची सत्ता पाडण्याची कामे सुरू आहेत. पण देशात सगळं आलबेल सुरू असल्याचे चित्र तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच आरोपही त्यांनी यावेळी केला.