राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान सोमवारी निवडणूक आयोगाने आणखी एक मोठा निर्णय घेतशिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगान उद्धव ठाकरे अणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचं वाटप केलं आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळालं असून, ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावासाठी मान्यता देण्यात आली आहे. यानंतर दोन्ही गटांकडून प्रतिक्रिया उमटत असून संजय राऊत यांनीही त्यावर भाष्य केलं आहे.
पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केलेले संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन अर्जावरील सुनावणीसाठी न्यायालयात आले असता संजय राऊत यांनी शिवसेना चिन्ह आणि नाव गोठवण्याबाबत मत व्यक्त केलं. शिवसेनेचे नवे चिन्ह कदाचित क्रांती घडवेल असं प्रतिपादन संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमच्यात शिवसेनेचे रक्त आहे. याआधी जनसंघ, काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. यात काही नवीन नाही. नवीन चिन्हानंतर हे पक्षही मोठे झाले. आम्हीही मोठे होऊ,” असं संजय राऊतांनी सांगितलं. खऱी शिवसेना कोणती हे लोकांना ठाऊक आहे असंही ते म्हणाले.
ठाकरे गटाच्या पक्षाच्या नावाासठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ असे तीन पर्याय आयोगापुढे सादर करण्यात आले होते. मात्र, ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ हा पक्षनावाचा पर्याय शिंदे गटानेही दिला होता. दोन्ही गटांकडून एकाच नावाचा आग्रह धरला गेल्याने हे पक्षनाव कोणत्याही गटाला न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आणि ठाकरे गटाच्या दुसऱ्या पर्यायाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ठाकरे गट आता ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ या नावाने ओळखला जाईल.