महात्मा बसवेश्वरांचा पुतळा एक इंचही हलणार नाही
माजी मंत्री आ. निलंगेकर यांची लिगायत समाज बांधवांना ग्वाही
लातूर/प्रतिनिधी ः शहरातील कव्हा नाका येथे असलेला महात्मा बसवेश्वरांचा पुतळा महानगरपालिकेकडून हलविण्यात येणार असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून समाजबांधवांमध्ये येत आहे. मात्र, या प्रकारच्या कोणत्याही वृत्तावर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत महात्मा बसवेश्वरांचा पुतळा एक इंचही हलु देणार नाही अशी ग्वाही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लिंगायत समाज बांधवांच्या शिष्टमंडळास दिलेली आहे.
शहरातील कव्हा नाका येथे असलेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात येत असल्याने तो काढून घेण्यात यावा, असे पत्र महानगरपालिकेस प्राप्त झालेले आहे. त्यानुसार मनपा आयुक्तांनी याबाबत पत्रव्यवहार सुरू केला असल्याचे समाजमाध्यमातून सागण्यात येत आहे. त्यामुळेच महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हलविण्यात येणार याबाबतही अनेक तर्कवितर्क लढविण्यात येणार आहेत. या अफवांना किंवा वृत्ताला आळा घालण्यासाठी आणि महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा हलविण्यात येवू नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी शहरातील लिंगायत समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी शिष्टमंडळाशी संवाद साधताना ग्वाही दिली आहे.
शहरातील महात्मा बसवेश्वर महाराजांसह सर्वच महापुरुषांचे पुतळे हे समाजबांधवांसाठी श्रध्दास्थान असून ते सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे सांगत राष्ट्रीय महामार्गाने शहरातील महात्मा बसवेश्वरांचा पुतळा काढून घेण्यात यावा, असे सांगितले असले तरी तो पुतळा एक इंचही हलणार नाही, असा शध्द आ. निलंगेकर यांनी यावेळी दिला. तसेच याबाबत तात्काळ मनपा आयुक्तांशी संवाद साधून महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हलविण्यासंदर्भात आगामी काळात कोणताही पत्रव्यवहार करण्यात येवू नये, अशा सूचना देवून तो विषय आता येथेच थांबवावा असेही सांगितले. तसेच याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्यासह संबंधित अधिकारी वर्गांशी चर्चा करून यासंदर्भात पत्रव्यवहारही करणार असल्याचे माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.
तसेच कन्हेरी गावठाण येथे असलेल्या लिंगायत स्मशानभूमी शासकीय संरक्षणामध्ये कार्यान्वित करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली असून याबाबतही मनपा आयुक्तांना लवकरात लवकर या स्मशानभूमीचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना आ. निलंगेकर यांनी दिलेल्या आहेत. लिंगायत समाज नेहमीच आमच्या पाठिशी भक्कमपणे उभा असल्याचे सांगत माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी आगामी काळातही समाजाच्या कोणत्याही प्रश्नासाठी आम्ही तत्परतेने सहकार्य करू अशी ग्वाही दिली.
यावेळी लिंगायत समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री आ. निलंगेकर यांचे आभार व्यक्त करत आगामी काळातही समाजाची संपूर्ण ताकद तुमच्या पाठिशी राहिल असा शब्द दिला. या शिष्टमंडळात वीरशैव समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ निगुडगे, सचिव उमाकांत कोरे, सिद्रामप्पा पोपडे, बंडाप्पा जवळे, अजय भुमकर, आनंद सलगरे, महादेव लामतुरे, सुहास अष्टके, चंद्रशेखर वडजे, कुमार स्वामी गणाचार्य, त्रिबंक चिक्राळे, शरणाप्पा अंबुलगे, बालाजी पिंपळे, राहुल पाटील यांच्यासह माजी नगरसेवक शैलेश स्वामी, संजय रंदाळे आदींची सहभाग होता.
वाचनालय व अभ्यासिकेला जागा उपलब्ध करून देणार
वीरशैव लिंगायत समाज शिष्टमंडळाच्या वतीने लातूर शहरात समाज बांधवांसाठी विद्यार्थी वसतिगृह, वाचनालय, अभ्यासिका यासह मंगल कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच खंडोबा गल्ली येथील वीरशैव सांस्कृतिक भवनचा मालमत्ता कर माफ करावा, अशीही मागणी केलेली आहे. याबाबत माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी वाचनालय व अभ्यासिकेसह सभागृहाकरिता आगामी काळात जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असा शब्द देवून सांस्कृतिक भवनच्या मालमत्ता कराबाबतही आयुक्तांना सूचना देण्यात येवून त्यासंदर्भात पत्रव्यवहारही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.