ausa नातेवाईकांच्या परिवारातील मुलाचा लग्न समारंभ संपन्न करून गावी परतत असताना भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात लातूर जिल्ह्यातील चौघांचा दुर्देवी मृत्यू झाला.औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटी जवळ अपघात घडला आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चौघांवर काळाने घाला घातल्याने परिसरात खळबळ माजली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी पुण्याहून निलंगा येथील बडूरकर यांच्या नातेवाईकांच्या मुलाचे पुण्याला लग्न समारंभ आटोपून निघाले होते. औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटी जवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाखाली पलटी झाली. यामध्ये अंश किरण बडुरकर, जय सचिन बडुरकर, अमर सचिन बडुरकर आणि प्रकाश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातात जान्हवी सचिन बडुरकर, यश किरण बडुरकर, गोदावरी सचिन बडुरकर, सचिन दिगंबर बडुरकर हे जखमी झाले असून त्यांना औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
लग्नानंतर नवरा नवरी आणि वऱ्हाडी दोन वाहनाने गावी निघाले होते. यातील नवरा नवरी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. अपघातात गोदावरी सचिन बडुरकर आणि जान्हवी सचिन बडुरकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चौघांवर काळानेघाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.