मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष संपायला अवघे पाच महिने बाकी आहेत. मात्र, अजूनही हे वर्ष उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरा करण्याविषयी सरकारकडून कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी व मराठवाड्यासाठी 2 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
मराठवाड्याविषयी अनास्था
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारच्या अनास्थेवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार आज सरकारवर संतापले. विधिमंडळाबाहेरील पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. हे अमृत महोत्सवी वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले तरी सरकार हा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात गंभीर नाही. मराठवाडा आणि मराठवाड्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाविषयी सरकारची अनास्था आहे. त्यांना याविषयी काही देणे-घेणे दिसत नाही. हे अमृतमहोत्सवी वर्षे साजरे करण्याविषयी सरकारकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत, तरी सरकारने या विषयी आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी.
सरकारकडून अद्याप प्रस्ताव नाही
अजित पवार म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा हा सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. सप्टेंबर महिन्यात या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात झाली. आता हे वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची मागणी आम्ही सर्वांनी केली होती. याविषयी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सुध्दा हा विषय मी मांडला होता. मात्र अजूनही सरकारकडून या विषयी कोणत्याही हालचाली सुरु नाहीत. मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा करण्याविषयी साधा प्रस्तावसुध्दा सरकारच्यावतीने सभागृहात आणला नाही. सरकार यानिमित्त काय कार्यक्रम साजरे करणार आहे ? त्याचे नियोजन काय ? हे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आलेले नाही.
एका ओळीचा ठराव मान्य नाही
अजित पवार म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे हे 75वे वर्ष आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची आमची मागणी होती. हे अधिवेशन 18 दिवसांचे होते. या अधिवेशनात मराठवाड्यावर एक दिवस चर्चा केली जाईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र, अद्याप त्यांना चर्चा करता आलेली नाही. आज यावर केवळ एका ओळीचा ठराव घेणे आम्हाला मान्य नाही. मराठवाडा मुक्सिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी समिती नेमलील होती. त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली होती. मात्र, या सरकारने अद्यापही या विषयावर काहीही कार्यवाही केली नाही. हा मराठवाड्याचा अपमान.