राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे. गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा सुरू होणार आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात गेल्या 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता आहे.
विधीमंडळात आजपासून अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होणार आहे. सरकारने केलेल्या घोषणांवर टीका केल्यानंतर विरोधक आज मोठ्या प्रमाणात आक्रमक होऊ शकतात. अवकळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे. त्यांना मदत करावी, कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे.
जुन्या पेन्शनसंदर्भात बैठक
जुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्य सचिवांनी आज बैठक बोलावली आहे. योजनेबाबत तोडगा न निघाल्यास 14 मार्चपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. या संपात आरोग्य कर्मचारीही सहभागी होणार आहेत, यामुळे आरोग्य यंत्रणांवर ताण येऊ नये यासाठी प्रशासन चर्चा करणार आहे. यावर यात कर्मचारी, शिक्षक संघटनांचा सहभाग असणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.
खैरेंची सत्तारांवर टीका
एकीकडे तरुण बेरोजगारीमुळे त्रस्त असतांना शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाने दाणादाण उडल्याने शेतकऱ्यांचे गव्हु, मका, हरभरा,भाजीपाला, फळबागा आदीचे नुकसान झाले. धक्कादायक बाब म्हणजे राज्याच्या कृषी मंत्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठवड्यात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एकट्या सिल्लोडमध्ये 3 जणांनी जीवन संपविले. नैतिक जबाबदारी घेत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.