नामांतर औरंगाबादचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे यावर स्पष्टीकरण मागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधला. त्यांच्या ट्वीटला रिट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यूत्तर दिले.
केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर नामांतराच्या निर्णयावर जोरदार राजकीय प्रतिक्रीया येत आहेत.
काय म्हणाले फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे.

यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही!, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते दानवे?
नामांतराच्या प्रस्तावातील निर्णयाचा फोटो शेअर करत अंबादास दानवे म्हणाले, “हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा.. ता. ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का हे पण सांगा.” असे स्पष्टीकरणही त्यांनी फडणवीसांकडे मागितले.
