पुणे, 12 फेब्रुवारी: काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. भगतसिंह कोश्यारी हे कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चे राहिले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांनी देखील राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी कोली होती.
संभाजीराजेंची प्रतिक्रिया
अखेर राज्यपालांचा राजीनामा आज मंजूर करण्यात आला आहे. त्यावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकारला सुचलेलं उशिराचं शहाणपण आहे. आता नव्या राज्यपालांनी घटनात्मक पदाचा आदर ठेवावा अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे.
दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा म्हणजे देर आये पर दुरूस्त आये असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी नवे राज्यपाल रमेश बैस यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत.