• Wed. Apr 30th, 2025

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीस लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव द्यावे  – माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची मागणी 

Byjantaadmin

Feb 6, 2023
मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीस लोकनेते विलासरावजी देशमुख यांचे नाव द्यावे  – माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची मागणी
लातूरकरांनी पंतप्रधानांना पत्र लिहिण्याचे आवाहन
      लातूर/प्रतिनिधी: महाराष्ट्रास देशाच्या विकासात अलौकिक योगदान देणाऱ्या लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूरसह मराठवाड्याचा विकास आणि विशेषतः रेल्वे प्रश्ना संदर्भात विलासरावजी देशमुख यांनी आपल्या कार्यकाळात मोठे योगदान दिलेले आहे. त्याची दखल घेत लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीला लोकनेते विलासरावजी देशमुख रेल्वे कोच फॅक्टरी असे नाव द्यावे, अशी मागणी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना लेखी निवेदनही पाठवले आहे. तसेच  लातुरकर नागरिकांनीही पंतप्रधानांना पत्र  लिहावीत, व नामकरण करण्याची विनंती करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
     ग्रामपंचायटचे सरपंच ते मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री अशा विलक्षण राजकीय प्रवासात लोकनेते विलासरावजी देशमुख यांनी लातूर जिल्हा, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात दूरदृष्टीने काम केले. रेल्वे प्रश्ना संदर्भातही ते सक्रिय होते. लातूर ते लातूर रोड नवीन रेल्वे मार्ग त्यांच्यामुळेच शक्य झाला. लातूर – कुर्डूवाडी नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी विलासरावजी देशमुख यांनीच पाठपुरावा केला. विलासरावजी देशमुख यांनी देशात प्रथमच मनरेगा मधून निधी उपलब्ध करून देत लातूरच्या रेल्वेची योजना पूर्णत्वास नेली, त्यांच्या या दूरगामी धोरणामुळेच लातूर येथून आज ब्रॉडगेज रेल्वे धावत आहेत.
लातूरसह शेजारील जिल्हे आणि मराठवाड्यातील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होत आहे. रेल्वे सेवा निर्माण करण्यासाठी मनरेगातून निधी देण्याचा क्रांतीकारी निर्णय विलासरावजी देशमुख यांनीच घेतला होता. या निर्णयाचा दूरगामी परिणाम झाला. यातून मागास मराठवाड्याचा विकास होण्यास मदत झाली. आज जेथे प्रकल्प उभा राहिला आहे त्या भागात रस्ते आणि विस्तारीकरणासाठी स्व.देशमुख यांच्याच पुढाकारातून उभारण्यात आलेल्या मांजरा कारखान्याने जागा उपलब्ध करून दिलेली आहे.
     स्व.विलासराव देशमुख यांचे हे योगदान लक्षात घेता लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीला त्यांचे नाव द्यावे. यातून मराठवाड्यातील जनतेचा बहुमान होइल, अशी मागणी गोजमगुंडे यांनी केली आहे.
पंतप्रधानांना पाठवावीत पत्र….
   लोकनेते विलासरावजी देशमुख यांचे लातूरकरांवर आणि लातूरच्या नागरिकांचे स्व.देशमुख यांच्यावर अतोनात प्रेम होते. या अनुषंगाने लोकनेते विलासरावजी देशमुख यांचे नाव मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीला देण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. लातूरकर नागरिकांनीही  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पत्र लिहावीत. पत्र अथवा ईमेल आणि इतर उपलब्ध समाज माध्यमांतून आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन त्यांनी केले. माननीय नरेंद्र मोदी हे गुजरात याज्याचे मुख्यमंत्री असताना विलासरावजी देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांच्या कार्याशी ते परिचित आहेत त्यामुळे या मागणीची नोंद घेवून नक्कीच यास मान्यता देतील अशी अपेक्षा माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *