उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेचा शपथविधीमागे पवारांची खेळी असू शकते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देशभरात चर्चा
23 नोव्हेंबर 2019 ला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार फारकाळ टिकू शकले नाही. मात्र त्यांच्या या पहाटेच्या शपथविधीची देशभरात चर्चा झाली. अजूनही विरोधकांकडून या घटनेचा उल्लेख केला जातो.
जयंत पाटील काय म्हणाले?
जयंत पाटील म्हणाले, मला वाटत नाही की अजित पवार भुलले असतील. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली एखादी खेळी असू शकते. अजित पवारांनी त्यावेळी जी विधाने केली त्याला फार महत्त्व आहे, असे मला वाटत नाही
शिवसेनेला साथ दिली
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री बनून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काम केले. स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी फुटली नाही. शिवसेनेचेच आमदार आमदार गेले म्हणून सरकार कोसळले. राष्ट्रवादीने शिवसेनेला शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली हे आपल्याला नाकारता येणार नाही. प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
काय झाले होते 2019 मध्ये?
2019 साली महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरु होता. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा केला. गडबड होऊ नये यासाठी दक्षता घेत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन या दोघांनी शपथ घेतली. परंतु हे सरकार अल्पायुषी ठरले.