मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. कारण ‘वंचित’चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गट आमच्यासाठी जेवढ्या जागा सोडेल, तेवढ्या जागांवर लढण्यास आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मध्यंतरी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात यासंदर्भात चर्चाही झाली होती.सार्वजनिक व्यासपीठांवर दोन्ही नेत्यांनी युतीच्यादृष्टीने सकारात्मक संकेतही दिले होते. त्यानंतर मंगळवारी प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम्ही पालिका निवडणुकीत ठाकरे गट आमच्यासाठी सोडेल तितक्या जागांवर लढू, अशी तयारी दर्शविली.
यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने BMC निवडणुकीत ८३ जागांवर उमेदवार उभे करायचे ठरवले होते. मात्र, आता ठाकरे गटाशी युती झाल्यामुळे ते जितक्या जागा सोडतील, त्या जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आता उद्धव ठाकरे हा प्रस्ताव मान्य करुन अधिकृतरित्या युतीची घोषणा कधी करणार, ते पाहावे लागेल. उद्धव ठाकरे यांच्याकडून यासंदर्भात महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी दाखवल्यास वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतात, हे पाहावे लागले. परंतु, प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यानुसार महाविकास आघाडीत वंचितला सामावून घेण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे वंचित, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र निवडणूक लढण्यास राजी करु शकतात का, हे पाहावे लागेल
शिवसेना (ठाकरे गट) आणि आमच्यात जागा वाटपाचे कोणतेही भांडण नाही. आमचा एकही नेता तपासयंत्रणांच्या रडारवर नाही. त्यामुळे वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीचे भविष्य मला स्थिर वाटत असल्याची टिप्पणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी-वंचितची युती होऊ नये, यासाठी प्रयत्न करतील: प्रकाश आंबेडकर
महाविकास आघाडीत वंचित बहुजन पक्षाचा समावेश होतो असे दिसल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून राजकीय खेळी खेळून या सगळ्यात आडकाठी आणू शकतात, अशी शक्यता प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविली. देवेंद्र फडणवीस हे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या चाव्या दाबतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनीही स्वतंत्रपणे लढावे, यासाठी फडणवीस पडद्यामागून प्रयत्न करतील, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.