शहरातील पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा – मनपा आयुक्त मानसी यांचे आवाहन
लातूर/ प्रतिनिधी: केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची पुनर्रचना करून सदर योजनेला माहे मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे शहरातील फेरीवाले , छोटे व्यावसायिक यांना याचा लाभ होणार आहे. आयुक्त मानसी यांच्या आदेशानुसार व उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनानुसार सदर योजने अंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “ लोक कल्याण मेळावा” आयोजित करण्यात येणार आहे. यात नवीन कर्ज प्रस्ताव स्वीकारणे, प्रस्ताव मंजूर करणे, वाटप करणे , फेरीवाले यांचे डिजिटल ओंनबोर्डिंग करणे, फेरीवाले यांचे स्ट्रीट फूड फेरीवाले यांचेसाठी प्रशिक्षण आयोजित करणे हे कामे केली जाणार आहेत.
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेत सुधारणा करून पहिले कर्ज मर्यादा १००००/- रु. वरून १५०००/- रु. , दुसरे कर्ज मर्यादा २००००/- रु. वरून २५०००/- रु. , इतकी वाढविण्यात आली असून तिसरे कर्ज ५००००/- रु. असणार आहे. याशिवाय योजनेचा लाभ घेणारे ज्यांनी दुसरे कर्ज वेळेवर नियमितपणे परतफेड केली आहे अशा लाभार्थ्यांना क्रेडीट कार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या व्यवसाय व वैयक्तिक अडचणीसाठी तात्काळ आर्थिक मदत मिळू शकेल. तसेच योजने अंतर्गत फेरीवाले यांना डिजिटल व्यवहारावर cashback मिळणार आहे. त्यामुळे डिजिटल पद्धतीने व्यवसाय करायला प्रोत्साहन मिळेल. याशिवाय शहरातील स्ट्रीट फूड फेरीवाले यांचेसाठी स्वच्छता व अन्न सुरक्षा याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
तरी शहरातील जास्तीत जास्त पात्र फेरीवाले यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त मानसी यांनी केले आहे.

