महाराष्ट्र महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

निलंगा : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाराष्ट्र महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक संत तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश प्रवक्ते सतिष हानेगावे हे होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मराठवाडा मुक्ती संग्रामातील योगदानाची माहिती दिली. तरुणांचे मनोबल वाढविण्यासाठी आर्य समाजाने केलेल्या कार्याचा उल्लेखही त्यांनी केला. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी सांगितले की, शिक्षणाच्या संधी निलंगा येथे उपलब्ध नसल्याने त्यांना गुलबर्गा, हैद्राबाद आणि नागपूर येथे शिक्षण घ्यावे लागले. त्याच नैतिक जाणीवेने त्यांनी महाराष्ट्र शिक्षण समितीची स्थापना करून निलंगा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. या परंपरेला महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील पुढे नेत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे, असेही हानेगावे यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. कर्मवीर कदम यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करुन स्पर्धा परीक्षा केंद्राची आवश्यकता प्रतिपादन केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी झाली पाहिजे या उद्देशाने या केंद्राची स्थापना करत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेचे समन्वयक दिलीपराव धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रशांत गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण दिवे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अभिजीत गोसावी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
