• Wed. Aug 6th, 2025

व्हीव्हीपॅट आणि कबुतरखान्याचा मुद्दा, वडेट्टीवारांची सरकारवर सडकून टीका

Byjantaadmin

Aug 6, 2025

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी (ता. 5 ऑगस्ट) नाशिक विभागातील आगामी निवडणुकांबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आयुक्त वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन नसणार, असे स्पष्ट केले. त्यामुळे याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. व्हीव्हीपॅट मशीन नसतील तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार यांनी बुधवारी (ता. 6 ऑगस्ट) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी व्हीव्हीपॅट मशीन आणि दादर कबुतर खान्याच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधाला.

पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, व्हीव्हीपॅटसाठी कारण दिले जात आहे की, एक प्रभागात जास्त उमेदवार असणार, मतदारांना एकावेळी चार मते द्यावी लागणार. त्यामुळे प्रक्रियेला वेळ लागेल आणि मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. पण निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी VVPAT ची आवश्यकता आहे. मतदाराने कुणाला मत दिले हे त्यांना समजले पाहिजे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशीन शिवाय घेऊ नये, या मशीन नसतील तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

तसेच, यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना दादर कबुतर खान्याबाबत सुद्धा विचारणा करण्यात आली. तेव्हा याबाबत ते म्हणाले की, हे सरकार जैन समाजाची फसवणूक करत आहे.. भाजपा आमदाराने कबुतरखाने याबाबत प्रश्न उपस्थित केला होता, मुंबई महापालिकेने कारवाई केली. जैन समाज रस्त्यावर उतरला तेव्हा भाजपाचे मंत्री या निर्णयाविरोधात जातात. म्हणजे निर्णय हेच सरकार घेणार आणि मग यू टर्न पण घेणार. नसलेले प्रश्न आणि समस्या हे सरकार निर्माण करत आहे आणि जैन समाजाचे तारणहार हे सरकार आहे असा दिखावा तयार करत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुका समोर ठेवून मतांसाठी भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे, भाजपाची ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली.तर, आपल्या देशाबाबत केंद्र सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना आहे. चीनच्या आक्रमणाबाबत त्यांनी प्रश्न विचारले तर न्यायाधीशांनी सच्चा भारतीय अस विधान करू शकत नाही, अशी टिपण्णी केली, हे योग्य नाही. देशात घडणाऱ्या घटनांबाबत सरकारला प्रश्न विचारण्याचे कर्तव्य विरोधी पक्ष नेत्यांचे आहे. पण कोण खरा भारतीय, कोण नाही याचे प्रशस्तीपत्रक न्यायाधीशांनी देऊ नये अशी स्पष्ट भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. एकीकडे भाजपा प्रवक्तेपदी असलेली व्यक्ती उच्च न्यायालयात न्यायाधीश होणार दुसरीकडे न्यायाधीश विरोधी पक्ष नेते यांच्यावर टिपण्णी करतात याने न्यायव्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा उडून जाईल. त्यामुळे देशातील लोकशाहीला गालबोट लागेल अशी विधान किमान न्यायाधीशांनी करू नये, असे म्हणत वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *