बीड : अंबाजोगाईकडून लातूरकडे भरधाव वेगात चाललेल्या कार-ट्रॉलीच्या भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात तिन तरुण जागीच ठार झाले आहेत. तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील मोरवड पाटीजवळ काल सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
अंबाजोगाईकडून लातूरकडे भरधाव वेगात चाललेल्या कारने क्रमांक (एम.एच. ४४ यु ०६४७) ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तीन तरुण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातामध्ये बबन राठोड, नंदू राठोड आणि राहुल मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, मृत तिघे परळीचे असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या कारखान्यावर जाणाऱ्या ऊसाच्या गाड्या जास्त करून रात्रीच्या वेळेतच प्रवास करतात. मात्र, कधी कधी या गाड्यांचा अंदाज न आल्याने अशा प्रकारचे अपघात नेहमीच होत असतात.