अनसरवाडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार संपन्न
निलंगा – मेहनत, एकाग्रता व सातत्य या जोरावर यश संपादन करता येते. यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतःला वंचित न समजता असलेल्या अभावातून यशाकडे झेप घ्यावी असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड यांनी केले. ते अनसरवाडा येथे शिवाजीराव पाटील विद्यालय अनसरवाडा च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष टी. टी .माने तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी संतोष स्वामी, माजी पंचायत समिती सभापती अजित माने, शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन ज्ञानदेव धुमाळ, मुख्याध्यापक दत्ता शाहीर, शेषराव गंगथडे उपस्थित होते.
विस्तार अधिकारी संतोष स्वामी म्हणाले ग्रामीण भागात गुणवत्तेची खाण आहे मात्र त्याला योग्य दिशा मिळाली तर निश्चितच यशाचे शिखर गाठण्यामध्ये हे विद्यार्थी मागे राहणार नाहीत यासाठी यांना विशेष मार्गदर्शनाची गरज असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दहावी मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या दिपाली कांबळे, द्वितीय ओम साई वीरभद्र होरे, तृतीय अमर व्यंकट धुमाळ व बंडी धनगर वस्तीतील भटक्या समाजातील तारासिंग अनिल बंडधनगर हा विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्यामुळे सत्कार करण्यात आला. तर इतर पंधरा विद्यार्थ्यांचे गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.एस.पेटकर, सूत्रसंचालन एम.एम.पेटकर, आभार पी.जी.घोटाळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्ही.एस.माने, संभाजी चांदुरे, दगडू जाधव, हेमा सगर, अमोल जाधव आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
