लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. तर देशभरात सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातली सर्वात रंगतदार लढाई होणार आहे ती म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार. बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर सुप्रिया सुळे उभ्या राहणार आहेत. तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर म्हणजेच घड्याळ चिन्हावर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत. ही लढत निश्चित मानली जाते आहे. या प्रकरणी आता शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांनी भाजपावर आरोप केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट
जुलै २०२३ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातले दिग्गज नेते असलेल्या शरद पवारांच्या NCP पक्षात उभी फूट पडली. कारण २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवारांनी सरकारमध्ये जात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर पक्षावरही दावा सांगितला. निवडणूक आयोगाने शिवसेनेप्रमाणेच निकाल देत पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवारांना दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे SHARAD PAWAR गट विरुद्ध AJIT PAWAR गट असे दोन गट तयार झाले आहेत.अशात लोकसभेच्या रणसंग्रामात बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगताना दिसणार आहे. या प्रकरणी आता सरोज पाटील यांनी भाजपावर आरोप केला आहे.
काय म्हणाल्या आहेत सरोज पाटील?
“मी कुटुंबातलीच सदस्य आहे, मी हे तुम्हाला सांगते, भाजपाला सुप्रिया सुळेंना पाडायचं आहे आणि सुनेत्राला निवडून आणायचं आहे. त्यामुळे शरद पवारांचा पराभव होईल असं त्यांना (भाजपा) वाटतं. पण बारामतीत शरद पवारांनी केलेलं काम, लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अजितने काम केलं आहे, अजित काम करतो पण या सगळ्याचा पाया शरदने घातला. पहिल्यांदा शरद आमदार झाला तेव्हा यशवंतराव चव्हाण घरी आले होते आणि म्हणाले होते शरद ही मतं तुझी नाहीत, ही मतं तुझ्या आई वडिलांची आहेत. तुझ्या आई वडिलांनी सामाजिक पाया घातला आहे. त्यामुळे तू तुझी मतं मिळव. शरदने प्रचंड काम केलं आहे, त्यामुळे तो पडणार नाही.”
सुनेत्रा आणि सुप्रिया दोघीही निर्मळ आहेत पण…
“सुनेत्रा आणि सुप्रिया दोघीही निर्मळ, सोज्वळ आहे. या दोघींना परस्परविरोधात लढवलं जातं आहे हे दुर्दैव आहे. पण दोघींचा स्वभाव चांगला आहे. पण सुप्रियाचा अभ्यास प्रचंड आहे. सुप्रिया सोन्याचा चमचा जरी तोंडात घेऊन जन्माला आलेली मुलगी.. पण एक इंग्रजी शब्दही तिच्या तोंडी नाही. सुप्रियाने प्रयत्न करुन तिची मराठी भाषा सुधरवली. तिच्यात खूप कणखरपणा आला आहे. तिला मुळीच गर्व नाही. तिच्यामध्ये आणि सुनेत्रात महत्त्वाचा फरक म्हणजे सुप्रिया संसदरत्न आहे. विरोधी पक्षाने तिला हे दिलं आहे. तडफदार भाषणं करण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. तिची भाषणं मोदीही ऐकत असतात. ती फिरते, गरीबांना मदत करते, शिक्षणसंस्थेत ती काम करते. तेवढा अभ्यास सुनेत्राचा नाही” असं सरोज पाटील यांनी म्हटलं आहे.