धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये सातत्याने घडामोडी वाढत आहेत. महायुतीतून या मतदारसंघात प्रचंड स्पर्धा आहे. तिन्ही पक्षांच्या इच्छुकांनी कंबर कसली आहे. सक्षम उमेदवार म्हणून ऐनवेळी पक्षाकडून भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव पुढे केले जाऊ शकते.याशिवाय सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे हेही इच्छुक आहेत. यात आणखी एका पाटलांची भर पडल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे.सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांतही विस्तार असलेल्या (Dharashiv Loksabha) मतदारसंघात उमेदवारही सर्वार्थाने सक्षम असावा लागतो. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका आणि लातूर जिल्ह्यांतील औसा तालुका, निलंग्यातील काही गावांचाही या मतदारसंघात समावेश आहे. महायुतीतील भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतही इच्छुकांची संख्या मोठी आहे.

भाजपकडून जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेकडून माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आरोग्यमंत्री डॉ.(Tanaji Sawant) यांचे पुतणे धनंजय सावंत इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार हेही कामाला लागले आहेत.
इच्छुकांच्या या यादीत आणखी एका मातब्बर नेत्याची भर पडली आहे. त्यामुळे स्पर्धा तीव्र झाली आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी राज्यमंत्री(Basavraj Patil) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी आता पक्षाने सांगितले तर धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी आहे, असे काही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
भाजपमध्ये प्रवेश करताना पाटील यांना कोणता शब्द देण्यात आला आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. पाटील यांनीही त्याबाबत कोणत्याही प्रकारचे संकेत दिलेले नाहीत. पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे, कारण पाटील आता त्यांच्याविरोधात औसा मतदारसंघात येणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.(BJP) कडून सेवानिवृत्त सनदी अधिकारी आणि ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी चाचपणी सुरू केली आहे. त्यांच्यासाठी एका संस्थेमार्फत मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात आले असून, जवळपास दीड लाख लोकांशी फोनवर संपर्क साधण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यातून काय निष्कर्ष निघाला, हे गुलदस्तात आहे.
निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हेही धाराशिव लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. ऐनवेळी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांचेही नाव समोर येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पक्षाने सांगितल्यास त्यांना रिंगणात उतरावे लागणार आहे.
या दिग्गजांच्या यादीत आता बसवराज पाटील यांचेही नाव आले आहे. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, साखर कारखाना आणि शैक्षणिक संस्थांचे जाळे, यामुळे पाटील यांच्या नावाचा पक्ष विचार करू शकतो, अशी चर्चा आहे. दिग्गजांच्या या स्पर्धेत भाजपकडून संताजी चालुक्य पाटील, नितीन काळे या फ्रेश चेहऱ्यांनीही निवडणूक लढवण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. राणाजगजितसिंह पाटील यांनी नकार दिला आणि पक्षाने तो मान्य केला, तर अन्य नावांचा विचार होऊ शकतो.जागा भाजपला सुटेल, असे गृहीत धरून या सर्व इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे धाराशिवचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर महायुतीतील शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता, त्यामुळे आता अजितदादा पवार गटाने दावा केला आहे.
बसवराज पाटील यांचा लिंगायत समाजासह सर्वच समाजात चांगला आधार आहे. 2009 मध्ये त्यांना औसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली होती. मतदानाच्या काही दिवस आधी औसा मतदारसंघात जाऊन त्यांनी विजय खेचून आणला होता. संघटनकौशल्याच्या बळावर त्यांनी हे शक्य करून दाखवले होते.राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, संघटनकौशल्यामुळे भाजप बसवराज पाटील यांच्या नावाचाही विचार करू शकतो. अर्थात भाजपकडून मतदारसंघात सातत्याने सर्वेक्षण केले जात आहे. त्यात कोणाच्या नावाला पसंती मिळेल, यावरच उमेदवारी कोणाला मिळणार, हे निश्चित होणार आहे.
…यामुळे संताजी चालुक्य, नितीन काळे यांच्या अपेक्षा वाढल्या
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची लोकप्रियता विरोधकांच्या चिंतेचा विषय आहे. राजेनिंबाळकर हे लोकांमध्ये सहज मिसळतात, लोकांची भाषा बोलतात. महायुतीत उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा असताना महाविकास आघाडीकडून राजेनिंबाळकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. महायुतीतील इच्छुक राजेनिंबाळकर यांच्या टीकेची झोड उठवत आहेत, मात्र ते सर्वांनाच उत्तरे देत नाहीत.
महायुतीचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर आपण बोलायचे, असे खासदार राजेनिंबाळकर यांनी ठरवल्याचे दिसत आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी तरुण उमेदवार हवा, असा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील आणि माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.