अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी भाजपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. महादेव जानकरांनंतर आता बच्चू कडूही भाजपवर नाराज असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भाजप मित्रांना वापरून फेकून देणारा पक्ष असल्याचं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांनी यवतमाळ इथं केलं होतंय. जानकरांच्या या वक्तव्याचं आमदार बच्चू कडूंनीही समर्थन केलंय. आपल्यालाही भाजपचा असाच अनुभव येत असल्याचं बच्चू कडू म्हणालेत. ते अकोला येथे बोलत होतेय. भाजपची भूमिका मित्रांना सोबत घ्यायचं अन काम झालं की सोडून द्यायचं अशी असल्याचा टोला कडूंनी लगावला आहे. जोपर्यंत चलती आहे तोपर्यंत हे सुरु राहील, असं बच्चू कडू म्हणाले. भाजप आणि उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे चांगले असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

अमरावती लोकसभेवर प्रहारचा दावा कायम असल्याचं कडू म्हणाले. पक्षाकडे पाच-सहा उमेदवारांचा पर्याय असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय. नवनीत राणांना उमेदवारी द्यायच्या मुद्द्यावर कार्यकर्तेच निर्णय घेणार असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय.मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांना सबुरीचा सल्ला दिला आहे. सरकारला अंमलबजावणीसाठी थोडा वेळ द्यावा, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. जरांगेंनी उपोषण करू नये, उपोषण हे क्षत्रियाला शोभत नाही. उपोषण हे पंडीत-पुजाऱ्यांना शोभतं. या बच्चू कडूंच्या वक्तव्यावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जरांगे पाटलांनी लोकसभेपेक्षा विधानसभा लढवावी, असा सल्ला कडूंनी जरांगेंना दिला. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात कोणतीच तांत्रिक अडचण नसल्याचं ते म्हटले.मनोज जरांगे यांनी थोडं उसंत घ्यावी, असं बच्चू कडू म्हणाले. सध्याची भूमिका अशी आहे की एप्रिल महिन्यात आचारसंहिता लागेल, मे महिन्यापार्यंत सरकार निर्णय घेईल. दोन महिन्यांपर्यंत या सरकारवर विश्वास ठेवावा, असं बच्चू कडू म्हणाले. २०१२ ची अधिसूचना जी आहे त्यामध्ये एखादा व्यक्ती कागदपत्रं देऊ शकत नसेल तर शपथपत्राच्या आधारे, गृहचौकशी करुन हा निर्णय घ्यावा, असं म्हटलं असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.