• Tue. Apr 29th, 2025

जे आयुष्यभर काँग्रेससोबत राहिले, त्यांनीच राज्यात काँग्रेसचा खासदार एकवर आणला, पटोले अशोक चव्हाणांवर बरसले

Byjantaadmin

Feb 24, 2024

सातारा: भाजप गॅरंटी शब्द वापरत आहे. पण हा शब्द आमचा असून त्यांनी चोरला आहे. या गॅरंटीला त्यांनी अपमानीत केले आहे. त्यांची गॅरंटी आता संपली आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला लगावला. तसेच धर्म, जातीच्या नावावर राजकारणाचा एक अजेंडा वापरण्याचे काम सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.सातारा जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सरचिटणीस नरेश देसाई, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा अल्पना यादव आदी उपस्थित होते. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागा वाटपाचे काम जवळपास निश्चित झाले आहे. राज्यात आम्ही ४२ लोकसभा मतदारसंघांमध्ये आमचे उमेदवार जिंकतील, असा दावा पटोले यांनी यावेळी केला.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आयुष्यभर काँग्रेससोबत राहिले. त्यांनीच राज्यात काँग्रेसचा खासदार एकवर आणून ठेवला, असा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला. ते पुढे म्हणाले की, राज्यातील मराठा तसेच धनगर समाजाला आरक्षणाच्या नावाखाली २०१४ पासून देवेंद्र फडणवीस फसवत आहेत. भाजपकडून आरक्षणाचा बागुलबुवा केला जात आहे. मराठा आणि ओबीसीत वादाचे बीज भाजपनेच रोवले. आता ते शिखरावर गेले आहे. भाजपमुळेच आरक्षणाला मूठमाती मिळालेली आहे, असा आरोप पटोले यांनी भाजपवर केला.पटोले म्हणाले की, आता मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा नुसता गवगवा केला जातोय. यातूनही भाजपने फसविण्याचेच काम केले असून मनोज जरांगे-पाटील आणि समर्थकांमध्ये वाद लावला जात आहे. भाजपकडून आरक्षणमुक्त भारतचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही जातगणना करायला तयार नाहीत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांच्याकडे उत्तर नाही. दिल्लीजवळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांना गोळ्या घालून मारले जात आहे. केंद्र शासनाने केलेले कायदे हे लोकशाही संपुष्टात आणण्यासाठीच केले आहेत. पण, देशात आता इंडिया आघाडीचेच सरकार येणार आहे.अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडून जाण्याबद्दल आणि त्यांचा रोख तुमच्याकडे असल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर पटोले म्हणाले, मी मंत्री नव्हतो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यांनी माझ्यावर आरोप करणे स्वाभाविक आहे. पण, ते आयुष्यभर काँग्रेसबरोबर राहिले. पण पक्षाचा खासदार त्यांनी एकवर आणून ठेवला, असे ठामपणे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed