विम्यापासून वंचित शेतक-यांना १० जानेवारी पर्यंत भरपाई मिळावी.
आ.संभाजी पाटील निलंगेकर यांचा विमा कंपनीस दिशा समितीच्या बैठकीत इशारा
लातूर प्रतिनिधी:-शेतकरी हितासाठी असलेल्या पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानीपासून संरक्षण मिळावे याकरीता शेतक-यांनी विमा रक्कम विमा कंपनीकडे भरणा केलेली होती. मात्र विमा कंपनीने महसूल विभागाच्या पंचनामा अहवालानुसार भरपाई न देता कंपनीने केलेल्या संर्वेक्षणानुसार विमा भरपाई शेतक-यांना दिलेली आहे. यामुळे अनेक शेतकरी विमा भरपाई पासून वंचित राहिलेले आहेत. केवळ ४० टक्के शेतक-यांनाच ही भरपाई मिळालेली असुन नुकसान झालेले असुनही भरपाई पासून वंचित असलेल्या शेतक-यांची संख्या मोठी आहे. या शेतक-यांना १० जानेवारी पर्यंत भरपाई विमा कंपनीकडुन न मिळाल्यास सर्व शेतक-यांना घेवून विमा कंपनीवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत दिला आहे.
खा.सुधाकर श्रृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीची बैठक पार पडली. यावेळी आ.अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे आदीसह अधिकारी व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतक-यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांच्या उत्पादनास संरक्षण मिळावे याकरीता पिक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने यावर्षी खरीप हंगामाकरीता लातूर जिल्हयातील शेतक-यांनी पिक विमा कंपनीकडे विमा रक्कमेचा भरणा केलेला होता. यावर्षी अतिवृष्टी, सततचा पाऊस व कीडरोग प्रादुर्भाव यामुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे महसूल विभागाकडुन पंचनामे होवून या आधारे शासनाने शेतक-यांना नुकसान भरपाई सुध्दा दिलेली आहे. मात्र विमा कंपनीने हे पंचनामे ग्राहय न धरता स्वत:च्या यंत्रणेमार्फत पंचनामे केलेले होते. वास्तविक हे पंचनामे करत असताना ज्या शेतक-यांनी चिरीमिरी दिली त्याच शेतक-यांचे योग्य पंचनामे केले आहेत. त्यामुळे त्याच शेतक-यांना विमा भरपाई प्राप्त झालेली आहे. ज्या शेतक-यांना पैसे दिले नाहीत. त्यांचे पंचनामे योग्य प्रकारे न केल्याने ते शेतकरी भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत.या शेतक-यांची संख्या ६० टक्केपेक्षा अधिक आहे. विमा कंपनीच्या या मनमानी कारभारामुळे शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहिले असल्याची बाब आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिली. तसेच जे शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले आहेत. त्या शेतक-यांना १० जानेवारी पर्यंत विमा कंपनीने भरपाई दयावी अन्यथा शेतक-यांना सोबत घेवून विमा कंपनीवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आ.निलंगेकर यांनी यावेळी दिला.
पिक कर्जाचे उदिष्ट राष्ट्रीयकृत बॅंकांना दिलेले असतानाही राष्ट्रीयकृत बॅकांनी ते उदिष्ट पूर्ण न करता अनेक शेतक-यांना पिक कर्ज दिले नसल्याकडे माजीमंत्री आ.निलंगेकर यांनी लक्ष वेधून ज्या बॅकांनी उदिष्ट पूर्ण केले नाहीत. त्यांना सूचना देवून हे उदिष्ट १०० टक्के पूर्ण करणे बंधनकारक करावे अशी मागणी यावेळी केली. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ अधिकाअधिक शेतक-यांना प्राप्त व्हावा याकरीता प्रशासनाने वेळोवेळी याचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे सांगून या माध्यमातून शेतक-यांना जोड धंदा करण्यासाठी ही योजना राबविणे गरजेचे असल्याचे सांगितले. याकरीता दर १५ दिवसाला जिल्हाधिका-यांनी या योजनेचा आढावा घ्यावा अशी सूचनाही केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अतिशय महत्वकांक्षी असलेली योजना म्हणजे जल जीवन जल मिशन ही आहे. ही योजना लोकहिताची असली तरी जिल्हयात मात्र या योजनेचा लाभ कंत्राटदारांना अधिकाअधिक कसा होईल यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे निदर्शनास आणुन देत याबाबतचा अहवाल संबंधीत विभागाकडुन घेवून ही योजना लोकहितासाठीच राबविली जावी याकडे विशेष लक्ष संबंधीत विभागाने दयावे अशी मागणी माजीमंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी केली. अमृत योजनेच्या माध्यमातून लातूर शहरात मलनिसारण व सांडपाणी पुर्न वापर प्रकल्प मंजूर करण्यात आलेला होता. यासाठी आवश्यक असणारा निधीही केंद्र शासनाकडुन प्राप्त झालेला होता. यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण होत असतानाच अचानकपणे ही प्रक्रिया ठप्प झालेली आहे. हे कोणामुळे झाले तो निधी का खर्च झाला नाही याचा अहवाल मनपा प्रशासनाने दयावा अशी मागणी यावेळी माजीमंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी केली.
या बैठकीत विविध विषयांवर आपले मत मांडताना माजीमंत्री आ.निलंगेकर यांनी केंद्र शासनाच्या विविध योजना आणि त्याकरीता आलेला निधी वेळेत खर्च होणे अपेक्षित असल्याचे सांगून या माध्यमातून होणारी कामे गुणवत्तपूर्ण आणि दर्जेदार व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हयातील बचत गटाच्या माध्यमातून होणारे काम उत्कृष्ठ असून त्यांनी उत्पादन केलेल्या विविध वस्तूना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाइी सर्वांनीच एकत्रीत प्रयत्न करणे अपेक्षित असल्याचे माजीमंत्री आ.निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रत्येक लोकप्रतिनिधीनी आपआपल्या भागातील बचत गटानी उत्पादित केलेल्या वस्तू दर महिन्याला खरेदी कराव्यात असे आवाहन करून बचत गटाना प्रोत्साहन मिळेल. आणि आपण लोकप्रतिनिधी सुध्दा याची जाहिरात करून शको. त्याकरीता ठराव घ्यावा अशी सूचनाही माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केली.