पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील शिवाजीनगरमधील शिवजयंती कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार गटातील बड्या नेत्याचा भाजप प्रवेश याबाबतच्या बातमीवर भाष्य केलं. याशिवाय विरोधी पक्षांची दररोज चर्चा असते असंही त्यांनी म्हटलं. जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह सगळ्यांची चर्चा रोज असते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तुम्ही विचार केला पाहिजे, २०० आमदार, ३०० खासदार एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक हवे आहेत. याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी गंमत आहे ना, आमच्याकडे काही तरी टॅलेंट आहे ना त्याच्याशिवाय एवढी मोठी ताकद असताना आम्ही छोटे पक्ष राहिलेले आहोत तरी ते प्रयत्न करतात म्हणजे काहीतरी दम आहे ना आमच्यात असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर आपण निकालावर बोलू, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. भाजप नेत्यांमध्ये हा काय अहंकार आहे, हे भाजपचे संस्कार आहेत याचं आश्चर्य आहेत? मी अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज यांच्यात अहंकार नव्हता. एवढा अहंकार भाजपकडे नव्हता, काय झालंय भाजपला, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जयंत पाटील यांच्या वक्तव्याबद्दल केला.

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीसंदर्भात विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की पक्ष फोडले, घरं फोडले आणि आता राज ठाकरेंना भेटायला गेले आहेत. म्हणजे भाजपला विजयाचा आत्मविश्वास नसल्याचं दिसून येतं, तुमच्या प्रश्नात उत्तर दडलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.कांदा निर्यातबंदी बाबतचा प्रश्न हा यश अपयशाचा नसतो. पियूष गोयल यांच्याकडे अनेकदा कांदा आणि इथेनॉलचं धोरण ठरवण्याची मागणी केली होती. कांदा आणि इथेनॉलचं धोरण बदलल्यानं शेतकऱ्याचं नुकसान होतं. या देशाला पूर्णवेळ कृषीमंत्री नाही. अर्जुन मुंडा उत्तम सहकारी आहेत पण त्यांच्याकडे अतिरिक्त चार्ज दिलेला आहे. कृषीप्रधान देशात पूर्णवेळ कृषीमंत्री नाही, हे दुर्दैवी आहे. सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे. आम्ही कांद्यासाठी रस्त्यावर आणि संसदेत लढा दिला, आज केंद्र सरकारला यूटर्न घ्यावा लागला ही शेतकऱ्याची, अन्नदात्याच्या ताकदीचा विजय आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.