छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या इतर काही नेतेमंडळींनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या विधानांचा विरोध करताना विरोधकांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून परत पाठवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावरून बोलताना भाजपाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. “असं बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे”, असं म्हणत उदयनराजेंनी परखड शब्दांत राज्यपाल आणि भाजपाच्या संबंधित नेत्यांवर टीकास्र सोडलं.
“काय वेळ आलीये? महाराजांचा जयघोष करण्यासाठी आलो असतो, तर वेगळा आनंद झाला असता. पण आपण काय करतोय? शिवसन्मानाचा निर्धार करण्याची वेळ आपल्यावर आलीये. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की वैयक्तिक स्वार्थासाठी लोकांच्या विचारात तुम्ही बदल केला. शिवाजी महाराजांचा आपण सन्मान करायला हवा हे बोलावं लागतं. ही बोलायची गरज आहे? ते अंतकरणातून आलं पाहिजे”, अशा शब्दांत उदयनराजेंनी आपली व्यथा बोलून दाखवली.
“लवकरच एक तारीख ठरवून मुंबईतल्या आझाद मैदानात जायचंय. आजचा दिवस इतिहासात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. कारण आज आपण आपल्या सगळ्यांची अस्मिता असणाऱ्या शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी एक निर्धार केला आहे. आज आपण सगळे इतिहासाचा भाग झालो आहोत. कुठल्याही प्रकारे यात राजकारण येऊ देऊ नका. यामागे कुणाचाच स्वार्थ नाही. शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कुणी करूनच दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ”, अशी घोषणा उदयनराजे भोसलेंनी यावेळी केली