देशाच्या राजकारणात अनेक दशके आपला दबदबा निर्माण केलेले ज्येष्ठ नेते शरद पवारांना भारतीय निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेल्याने वयाची 80 पार केलेल्या शरद पवारांना आता नव्याने पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. हा लढा तितका सोपा असणार नाही. सध्यातरी त्यांना तीन पातळ्यांवर आपली लढाई सुरू ठेवावी लागणार आहे. loksabha निवडणुकीच्या तोंडावर पक्ष आणि चिन्हे गेल्याने शरद पवार गटासाठी मोठा धक्का आहे. निवडणुकीसाठीचा कालावधी खूप कमी राहिल्याने या वेळेत राज्यभरात आपला नवा पक्ष आणि चिन्ह पोहचवण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे. सोबतच (Supreme Court)ची लढाई आणि इंडिया आघाडीतील आपले महत्व शाबूत ठेवण्याची कसरतही करावी लागेल, हे निश्चित.

आधी पक्षाला नवे नाव व चिन्ह
अजित पवार गटाकडे पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्याने शरद पवार गटाला पहिले काम पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह मिळवण्याचे असेल. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तातडीने त्याबाबत कालच कळवलेही आहे. त्यानंतर शरद पवार गटाकडून आजच पक्षाची तीन नावे व चिन्ह याचे पर्याय आयोगाकडे दिले जाणार आहेत. याबाबत दिल्लीत खलबतंही सुरू आहेत. पक्षाच्या नव्या नावामध्ये ‘राष्ट्रवादी’ शब्द असेल, अशी दाट शक्यता आहे. हे नाव आधीच कानाकोपऱ्यात पोहचल्याने त्याचा फायदा होऊ शकतो.
आयोगाकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्याने ते घराघरापर्यंत पोहचवण्याचे आव्हान नेते, कार्यकर्त्यांसमोर असेल. सध्यातरी पक्षातील नेत्यांकडून शरद पवार हेच आमचा पक्ष आणि चिन्ह असे सांगत आहेत. पण निवडणूक प्रक्रियेत चिन्हाला महत्व असल्याने ते मतदारांच्या मनावर ठसवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.