वाशी : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा वादळ मुंबईत (Mumbai) येऊन धडकलं आहे. मुंबईत आल्यानंतर सरकारची धावाधाव सुरु झाली आहे. जरांगे पाटील mumbaiत पोहोचताच सरकारने पुन्हा त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सरकारकडून देण्यात आलेला प्रस्ताव आता मनोज जरांगे पाटील सभेच्या माध्यमातून समाजासमोर मांडणार आहेत. त्यांनी आपल्या सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या तमाम मराठा बांधवानो म्हणत सुरुवात एकच जल्लोष झाला. यावेळी झालेल्या गर्दीला शांत करत त्यांनी सरकारकडून देण्यात आलेल्या प्रस्तावाची आपल्याला माहिती देत असल्याचे सांगत शांततेचे आवाहन केले.
आम्ही मुंबईमध्ये गुलाल उधळणार
दुसरीकडे, मुंबईतील मराठा आंदोलन आणि आझाद मैदानातील तयारी समन्वयक वीरेंद्र पवार यांच्याकडून केली जात आहे. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले आम्ही मुंबईमध्ये गुलाल उधळणार आहोत. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्टेजचा मंडप करायचा नाही. आम्हाला मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण नको आहे. गुलाल उधळलाच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. सरकारने पाठवलेल्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. आमची लढाई हक्कासाठी आहे. योग्य निर्णय झाल्यास राम मंदिरानंतर जितके फटाखे फुटले नाहीत, तेवढे दुप्पट फटाके उधळले जातील.
सीएसटीवरील गर्दी आझाद मैदानाकडे
दरम्यान, राज्यभरातून मुंबईत मराठा समाज दाखल होत आहे. आज सकाळी सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती. आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर चक्काजाम केला. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांशी संवाद साधत वाहतूक सुरळीत केली. याठिकाणी जमलेल्या आंदोलकांना आझाद मैदानाकडे जाण्यास सांगण्यात आले. दुसरीकडे, वाशीमध्ये मराठ्यांची पदयात्रा येऊन थांबली आहे. हा ताफा आझाद मैदानात पोहोचणार की तोडगा काढला जाणार? याकडे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री Eknath shind eयांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सरकारकडून आलेल्या अध्यादेशावर ते आज दुपारी दोन वाजता वाशीतून कोणती भूमिका घेतात यावर मुंबईतील मराठ्यांचा मोर्चा अवलंबून असेल.
