“भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही. खोक्यात बंद झालेल्यांना खोक्यातून परत काढण्याची गरज नाही”, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. उल्हासनगर येथील राजेश वानखेडे यांनी आज शेकडो सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवबंधन हाती बांधले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे शिंदे गटावर चांगलेच बरसले.
पक्षप्रवेश करताना, राजेश वानखेडे यांनी “आज आपल्या घरात आल्यासारखे वाटते”, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही फार महत्वाच्या शब्दांमध्ये भावना मांडल्या. पण, काही जण बाहेर भटकंतीला गेले आहेत. त्यांना परत घरात घेणार नाही. कारण जे खोक्यात बंद झालेत त्यांना पुन्हा खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही.” यावेळी शिवसैनिकांनी ’50 खोके एकदम ओके’, अशा घोषणा दिल्या.
उल्हासनगर येथील राजेश वानखेडे ह्यांनी आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी त्यांचे सहकारी उपस्थित होते. pic.twitter.com/jvRlXHvm9M
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 7, 2024
नाशिकला येण्य़ाचे आवाहन-
आमच्याकडे शिवसैनिकांची माया, प्रेम, जिद्द, हिम्मत आहे. तुम्ही परत आलात तुमचे स्वागत आहे. लढाई फार मोठी आहे. आपल्यासमोर खोकेवाले आहेत. एवढे खोके घेऊनही घटनाबाह्य सरकारला उठता बसता मीच दिसतो. 23 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात कार्यक्रम जाहीर केला आहे. काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार आहोत. 23 तारखेला नाशिकला सर्वांनी या, असे आवाहनही ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.
तिन्ही निडणुका एकत्र घ्या-
यावेळी ठाकरे यांनी विरोधी पक्षाला निवडणुका घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, तुम्ही तिन्ही निवडणुका घ्या. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणूका एकत्र लावा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काय आहे ते कळेल. लवकरच राम राज्य येणार असल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.