‘माझ्या गावची चिंच दुसरीकडे कुठेच मिळत नाही‘ असे आत्मविश्वासाने सांगणे असते ब्रॅण्डिंग – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर–घुगे
- जी. आय. मानांकन प्राप्त लातूर जिल्ह्यातील तीनही उत्पादक संघाचा जिल्हाधिकारी यांनी केला गौरव‘माझ्या गावची चिंच दुसरीकडे कुठेच मिळत नाही‘ असे आत्मविश्वासाने सांगणे असते ब्रॅण्डिंग – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर–घुगे
लातूर, (जिमाका) : ‘माझ्या गावची चिंच दुसरीकडे कुठेच मिळत नाही’ असे उदगार पटडी उत्पादक संघाचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांनी सत्कार करतांना व्यक्त केले होते. तोच धागा पकडून जिल्हाधिकारी म्हणाल्या ‘माझ्या गावची चिंच दुसरीकडे कुठेच मिळत नाही’ असे आत्मविश्वासाने सांगणे म्हणजेच आपल्या प्रॉडक्टचे ब्रॅण्डिंग असते. ही टॅग लाईन फक्त पुण्या-मुंबईत नाही, तर आपले शेतकरीही करू शकतात, याच हे उदाहरण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या एक दिवशीय कार्यशाळेत बोलताना केले.
जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने लातूर जिल्हा उद्योग समूह इमारतीत आयोजित ‘इग्नाइट महाराष्ट्र’ या उद्योजकांना आणि नव उद्योग उभे करू इच्छिणाऱ्यांसाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची देणाऱ्या कार्यशाळेत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. उद्योग विभागाचे सहसंचालक बी. टी. यशवंते, उद्योग विभागाच्या मैत्र प्रकल्पाचे नोडल अधिकारी उपसंचालक दीपक जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. हणभर यांच्यासह विविध उद्योग विषयातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.
लातूर जिल्हा औद्योगिक दृष्ट्या पुढे जाण्यासाठी ज्या-ज्या गोष्टीची गरज लागेल, त्या त्या गोष्टीचा पाठपुरावा जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे केला जाईल. लातूर जिल्ह्यातील तालुका स्तरावरील एम. आय. डी. सी. अधिक मजबूत करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. शासनाने चाकूर, जळकोट एमआयडीसी मंजूरी बरोबर जिल्ह्यातील एम.आय.डी.सी. विस्तारीकरणासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पण ब्रँडिंग हा विषय अत्यंत महत्वाचा असून आता एग्रो बेस प्रॉडक्ट अधिकाधिक निर्यात कसे होतील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी असे प्रशिक्षण महत्वाची भूमिका बजावत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील बोरसुरी डाळ, पटडी चिंच, कास्ती कोथिंबीर उत्पादक संघाला जी. आय. मानांकन मिळाल्या बद्दल आनंद व्यक्त करतांना जिल्हाधिकारी म्हणाल्या, या तीन कृषी उत्पादनाला भौगोलिक मानांकनाने जिल्ह्याचा बहुमान झाला आहे. यातून अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा आणि बळ मिळाले आहे. जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, या तीनही उत्पादक संघ यांच्या प्रयत्नातून हे जी.आय मानांकन मिळाले, त्यासाठी सर्वांचे अभिनंदन करून या तीनही कृषी उत्पादनाचे उत्तम ब्रँडिंग व्हावे, यासाठी प्रशासन स्तरावरूनही आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.
जी आय मानांकन प्राप्त उत्पादक संघाचा गौरव
बोरसुरी डाळीसाठी बोरसुरी डाळ उत्पादक संघ ता. निलंगाचे अध्यक्ष धोंडीराम रोडे (मो. नं.9766293222), पटडी चिंचेसाठी पटडी चिंच उत्पादक संघ पानचिंचोली ता.निलंगा चे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी ( मो.नं.8975256633), कास्ती कोथिंबीर कास्ती कोथिंबीर उत्पादक संघ, आशिव ता. औसाचे अध्यक्ष नामदेव माने (मो.नं.9421196768) यांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी तिन्ही उत्पादक संघाने उत्पादन भेट दिली.
यावेळी महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन बनविणाऱ्या श्रीमती ज्योती शिंदे, सोया प्रॉडक्ट बनविणाऱ्या गुरु सेवा प्रॉडक्टच्या श्रीमती साधना देशमुख यांचाही जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन
अपेडा, मुंबईच्या प्रणिती चावरे, जिल्हा उद्योग केंद्राचे पी. पी. खाडे यांनी कृषी माल निर्यात लातूर जिल्ह्याचे नियोजन यावर माहिती दिली. पुणे येथील उद्योग तज्ज्ञ सुरेश धापोडकर, निर्यात सल्लागार सुरेश पारेख, बँकर्स स्थितप्रज्ञ नायक, श्री. गुंड, सुभाष इंगेवार, मिलिंद काळे, योगेश देशपांडे, कवठेकर यांनी उद्योग उभारणी, ब्रँडिंग, भांडवल यावर सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग विभागाचे सहसंचालक बी. टी. यशवंते यांनी केले. त्यावेळी त्यांनी या कार्यशाळा आयोजनाचा हेतू विशद केला.