मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभरात आंदोलनाचे लोण पसरले, त्याला जबाबदार कोण?. समाजाच्या युवकांमध्ये असंतोष पसरला, त्याला कोण जबाबदार आहे, याचे आत्मपरिक्षण राज्य सरकारने केले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य शासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी चाळीस दिवसांचा कालावधी मागून घेतला होता. त्या कालावधीत एक तरी बैठक घेतली का?, असा प्रश्न त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जळगाव येथे झाली. यावेळी खडसे यांनी राज्य सरकार तसेच गिरीश महाजन, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर देखील टिका केली.
राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारविरुद्ध जनतेत प्रचंड आक्रोश आहे. आश्वासने देऊन विविध समाजाची दिशाभूल या सरकारकडून केली जात आहे. महाराष्ट्रात सध्या आणीबाणीसदृष्य परिस्थिती आहे. त्यामुळे जनता त्यांना कंटाळली आहे. जनतेला आगामी काळात चांगला पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पाहिले जाते, असा दावा त्यांनी केला.खडसे राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे या सरकारने गांभिर्याने पहायला पाहिजे होते, मात्र तसे होताना दिसले नाही, अशी नाराजी व्यक्त केली. आजची राजकीय स्थिती वादळी झाली आहे. राज्यात सरकारविरुद्ध वातावरण आहे. जनता सरकारच्या विरुद्ध आहे. मनोज जरांगे-पाटलांचे उपोषण सुरू झाले, तेव्हा सरकारने ४० दिवसांचा अवधी मागून घेतला. मात्र, या दिवसांत सरकारने बैठक घेतली नाही. आश्वासन पाळले गेले नाही. त्यामुळे मराठा समाजाचा उद्रेक रस्त्यावर झाला. सरकारच्या हलगर्जीमुळे हे घडले.यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी खडसे बोलत होते. पक्षाचे निरीक्षक प्रसन्न पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, अरुण पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, शहराध्यक्षा मंगला पाटील, वाल्मीक पाटील, जिल्हा बँकेचे संचालक नाना पाटील, डॉ. सुरेश सूर्यवंशी, रिटा बाविस्कर, जिल्हा समन्वयक विकास पवार आदी उपस्थित होते.