मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना धनगर समाजानेही आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशीच त्यांनी धनगर समाजालाही पेटून उठण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, धनगर आरक्षणासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं. चौंडी येथे आयोजित केलेल्या धनगर मेळावा कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील बोलत होते.
जरांगे पाटील म्हणाले की, “डोंगरात, दरीत, पाण्यात, पावसात तुम्ही मेंढरं चारता. तुमचं स्वप्न एकच आहे की माझ्या वाट्याला कष्ट आले ते माझ्या लेकराच्या वाट्याला नकोत. पण कोणाचंच स्वप्न पूर्ण होत नाही. आरक्षणापायी स्वप्न भंग होतात. रात्रंदिवस कमावलेला पैसा वाया जातो. आमचा मराठा समाजही उस तोडायचा. रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जायचा. स्वप्न एकच आमच्या वाट्याला जे कष्ट आले ते लेकराच्या वाट्याला येऊ नयेत. म्हणून आरक्षण पाहिजे. म्हणजे आपल्या दोघांचं (मराठा-धनगर) दुखणं एकच आहे.