राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुन्हा एकदा मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. आज बारामती तालुक्यातील सोमेश्वर या ठिकाणी अजित पवार एका कार्यक्रमाला आले असताना त्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करताना मराठा आरक्षणाचा निर्णय झालाच पाहिजे असंही कार्यकर्त्यांनी म्हटलं. त्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं.
त्या आधी माढ्यात झालेल्या सभेच्यावेळीही अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत असून ठिकठिकाणी मराठा आंदोलक आंदोलन करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 62 व्या गळीत हंगामाला आल्यानंतर शुभारंभ झाल्यानंतर सभेच्या ठिकाणी जात असताना मराठा समाजाच्या युवकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. पोलिसांनी या कार्यकर्त्याना सभेच्या ठिकाणाहून समजूत काढत बाहेर काढले आहे.
दरम्यान, रविवारी बारामती तालुक्यातील पणदरे या ठिकाणी पवार यांचा नागरिक सत्कार ठेवण्यात आला होता. या ठिकाणी देखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना घेराव घालून तुमची भूमिका काय असा सवाल उपस्थित केला होता. सोमवारी माढा तालुक्यातील पिंपळणेर याठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला गेल्यानंतर त्या ठिकाणी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. यामुळे मराठा समाज आरक्षणाच्या मुद्दावरुन आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत .
सोलापुरात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. मुख्यमंत्री EKNTH SHINDE , उपमुख्यमंत्री DEVENDRA FADNAVIS , अजित पवार, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवर, चंद्रकांत पाटील यासह विविध नेत्यांचे फोटो पुतळ्यावर आहेत. दसऱ्याच्या दिवशी ज्या पद्धतीने रावणाचे दहन केले जाते तसे आम्ही 11 मुखी सर्वपक्षीय नेत्यांचा पुतळा दहन केलाय अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.
राज्यात मराठा आरक्षणावरून तरुण आत्महत्या करत आहेत, मात्र राजकीय नेते शक्तिप्रदर्शन करत दसरा मेळाव्या घेण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा आणि दहन केला आहे. तरुणांनी आत्महत्या करू नये, गनिमी कावा पद्धतीने रस्त्यावर उतरून लढा उभरावा अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समवन्वयक राम जाधव यांनी दिली.