मुंबईत एका ४५ वयाच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. सुनील कावळे असं त्याचं नाव आहे. कावळे हे जालन्यातील अंबडचे रहिवासी होते. त्यांनी आत्महत्येपूर्वी तीन पानांचे पत्रही लिहिले आहे. या घटनेनंतर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण समाजाला संयम राखण्याचं आवाहन केलं आहे.सरकारमुळे आमचे बळी पडायला लागले आहेत. आपल्याला आरक्षण मिळणार आहे. घेतल्याशिवाय सोडणार नाही. खूप वर्षे धीर धरला आहे. आणखी थोडे दिवस दम धरा. मुलंच कमी व्हायला लागले, बळी जायला लागले, आत्महत्या करायला लागले तर आरक्षण घेऊन उपयोग काय? तुम्ही दम धरा, आरक्षण मिळल, आपण सोडणार नाही, असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे.हे सगळं पाप सरकारचं आहे. आमचे किती आणखी मुडदे पाडायचे हे माहीत नाही. ज्या आमच्या माणसाने आत्महत्या केली, त्याला जबाबदार हे सरकार आहे. सरकारने आतातरी त्या भावांचं बलिदान वाया जाऊ देऊ नये. सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा निर्णय आता घ्यावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.२४ तारखेनंतर होणारं शांततेलं आंदोलन सरकारला परवडणारं नाही. आणि आम्ही हे बलिदान आता वाया जाऊ देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. आत्महत्येबाबत आपल्याला आताच कळलं. त्या कुटुंबाशी मी बोलणार आहे. परंतु, मी पुन्हा सांगतो, भावांनो आपला बळी देऊ नका. हे सरकारचं पाप आहे. हा गेलेला बळी याची गाभीर्याने दखल घेऊन सरकारने आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा. आमच्या भावाचं स्वप्न पूर्ण करा, आमचे मुडदे पडू देऊ नका, असं जरांगे पाटील म्हणाले.
या सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये. कारण झालेली आंदोलनं आणि बळी आम्ही वाया जाऊ देणार नाही. आता २४ तारखेनंतर सरकारला सुटी नाही, पण मराठा समाजाला आवाहन आहे. थोडा धीर धरा. पाया पडून सांगतो कोणी आत्महत्या करू नका, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. मुंबईतून गेल्यावर पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे. आम्हाला दुःख असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.