मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. राज्य सरकारने या संदर्भात अद्याप कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. मराठा तरूण टोकाचे पाऊल उचलत आहेत. जालना जिल्ह्यातील एका तरुणाने जरांगे पाटील यांना पत्र लिहून मुंबईत आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी संताप व्यक्त करत राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.
मराठा तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेचा दाखला देत ashok chavan यांनी केंद्र आणि राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन आरक्षणाबाबत ठोस पावले उचलावीत, असे म्हटले आहे. `एस्क` वरील प्रतिक्रियेत त्यांनी मराठा तरुणांनाही टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे.मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय असलेले सुनील कावळे यांच्या आत्महत्येची दुर्दैवी घटना प्रसारमाध्यमांमधून समोर आली आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.
माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की, कृपया कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नका. आपले आयुष्य संपवून मराठा आरक्षण मिळणार नाही, तर त्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने लढा द्यावा लागणार आहे.त्यासोबतच माझी केंद्र व राज्य सरकारलाही विनंती आहे की त्यांनी मराठा कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांची गंभीर दखल घ्यावी आणि मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.दरम्यान, सुनील बाबूराव कावळे (वय ४५, चिकनगाव, ता. अंबड, जि. जालना) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येनंतर मराठा समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनील कावळे हा एकटाच जालण्याहून मुंबईत आला होता. बांद्रा परिसरात त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्वतःच्या शर्टवर आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करीत असल्याचे त्याने लिहिले आहे. कावळे याच्या बॅगमध्ये पोलिसांना मोबाईला फोन आणि एक सुसाइड नोट सापडली आहे. नोटच्या शेवटी त्याने सर्वांची माफीदेखील मागितली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्याने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.