शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वच राजकीय पक्ष पोटतिडकीने बोलत असले तरी अद्याप यावर कायम स्वरुपी तोडगा कोणालाच काढता आलेला नाही. दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्रा अद्याप थांबलेले नाही. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्रिमंडळात 3 मंत्र्यांचा समावेश आहे. असे असतानाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे राज्यकर्त्यांविषयी संताप व्यक्त होत आहे.मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्याचे सर्व प्रयत्न फेल गेले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. यातील दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असल्याचे समोर आले आहे. यात कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे (वय 48 वर्षे), फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) आणि वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद साहेबराव मतसागर ( वय 43 वर्षे) या शेतकऱ्यांचा समावेश आहे.
कन्नड तालुका
कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे या शेतकऱ्याने शेतातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (10 सप्टेंबर) रोजी दुपारी दोनच्या दरम्यान उघडकीस आली. त्यांनी शेतातील राहत असलेल्या घरात रविवारी दुपारी आत्महत्या केली. याची माहिती पोलिस पाटील प्रकाश पवार यांनी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिनकर बिडवे यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दिनकर यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
फुलंब्री तालुका
पावसाअभावी वाया गेलेल्या पिकाच्या नैराश्यान फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा गावातील शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालायत त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांचा मृत्यू झाला. कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) असे या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी त्यांनी विषारी औषध प्राशन केले होते. गेल्या तीन दिवसांपासून घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी पीरबावडा येथे संध्याकाळी झाला आहे. या प्रकरणी वडोद बाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
वैजापूर तालुका
नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन केलेल्या वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद मतसागर यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यातील जरूळ येथील अरविंद मतसागर यांच्याही शेतातील पिके करपून गेली होती. त्यामुळे नापिकीमुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या विवंचनेत असलेल्या अरविंद यांनी शनिवारी विषारी औषध सेवन केले. त्यांना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी दुपारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचे भाऊ संतोष साहेबराव मतसागर यांनी दिलेल्या माहितीवरून वैजापूर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.