राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी ठरले आहे. कितीही प्रयत्न केले तरी आताच्या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा ‘कलंक’ पुसता येणार नाही, अशा शब्दांत जयंत पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, कर्जबाजारीपणा, नापिकी, महागाईमुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती, गेल्या वर्षी अतिवृष्टी, त्यानंतर आता दुष्काळाचे संकट या सगळ्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
राज्यात यंदा हवा तसा पाऊस पडलेला नाही. अनेक गावांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी केलेली पेरणी पावसा अभावी पिके शेतातच जळून गेलीत. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. तसेच कर्ज देखील वाढत चालले आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
जयंत पाटलांचे ट्विट काय?
एकीकडे सभागृहात बोलताना मुख्यमंत्री राज्याला शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याची घोषणा करतात. दुसरीकडे मराठवाड्यात मात्र शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक गाठला आहे. गेल्या आठ महिन्यात तब्बल 865 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची आकडेवारी धक्कादायक आहे. दिवसाला सरासरी 2 ते 3 शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी, महागाईमुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती, गेल्या वर्षी अतिवृष्टी, त्यानंतर आता दुष्काळाचे संकट या सगळ्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा हा ‘कलंक’ सरकारला पुसता येणार नाही.