जालन्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर उपोषणकर्ते मनोज जरांगे ठाम आहेत. काल (बुधवारी) मंत्रिमंडळाची बैठकीत सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी टोला लगावला आहे.”कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही. कायदेशीर मार्गाने आरक्षण द्यावे लागेल,” अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
“मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे,” असे मतदेखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.शिवशक्ती परिक्रमाच्या निमित्ताने सांगलीमध्ये पंकजा मुंडे यांचे मोठ्या जल्लोषात भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले. सांगलीचे आराध्यदैवत गणपतीचे पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतलं.राज्य सरकारने या प्रकरणी काल (बुधवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुणबी दस्तावेज दाखवणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. तसा GR ही काढला. पण त्यात वंशावळ दाखवण्याची अट ठेवली. त्यावर मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी हरकत घेऊन सरकारचे टेन्शन वाढवले. “वंशावळी” हा शब्द काढा मगच उपोषण मागे घेतो, सरसकट आरक्षण द्या, असे सांगत मनोज जरांगे यांनी निर्णयात सुधारणा करण्याचे सरकारला सुचवले.मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर महाराष्ट्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवून केंद्र सरकारला मराठा आरक्षणाबाबतचा ठराव पाठवून द्यावा. केंद्र सरकारने बोललेल्या विशेष अधिवेशनामध्ये हा ठराव मंजूर झाल्यानंतर तो कायदा होऊन आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. कुणबी समाजाचे दाखले देण्याबाबतचा निर्णय हा फक्त काही ठराविक जणांबाबत नसावा, त्यामुळे इतरांचा प्रश्न तसाच प्रलंबित राहू शकतो. मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नयेत,” असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला.