राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवावे, ठराव घ्यावा. एकमताने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा. केंद्राने बोलावलेल्या वन इंडिया वन नेशन अधिवेशन हे उपद्व्याप करणार्यांनी यामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
मला डिवचण्याचा कोणी प्रयत्न करू नये, विनाकारण मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडण लावण्याचे काम राज्य सरकारने करू नये असा इशारा महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सिंदखेडराजा येथे जनसंवाद यात्रेदरम्यान दिला. सिंदखेडराजा येथे आल्यानंतर राजमाता जिजाऊ यांचे दर्शन घेतले त्यानंतर पत्रकाराची संवाद साधला.
सत्तेचा मलिदा खात होते का?
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार वेळकाढूपणा करीत आहे, हे चांगले नाही. अगोदरच्या राज्य सरकारमधील 28 मंत्र्यांपैकी सध्याच्या मंत्रिमंडळात त्यापैकी 18 मंत्री आहेत त्यांची जबाबदारी नाही का मराठा आरक्षण संदर्भात आवाज उठवण्याची? त्यावेळेस ते काय करीत होते? लाडू खात होते का? सत्तेचा मलिदा खात होते का? खुर्ची उबवत होते. नागपूरचा रिमोट कंट्रोल हे सर्व करून घेत आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
नार्को टेस्ट होणे गरजेचे
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मराठा बांधवांवर झालेल्या लाठीमाराचा नेमका आदेश कोणी दिला यांची नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्य बाहेर येईल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये महिलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी या संदर्भात बोलताना ते म्हणाले, राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचा, या भूमीचा आदर ठेवून तसे प्रयत्न करू. परंतु तो विषय माझ्या एकट्याच्या हातात नाही.
शेतकर्यांची कर्जमाफी करावी
विजय वडेट्टीवार म्हणाले की, गारपीट, अतिवृष्टी दुष्काळी ओला दुष्काळ किसान सन्मान योजना पंतप्रधान सन्मान योजना 50 हजार रुपये मागेल त्याला कर्ज याचे कोणतेच पैसे शेतकर्यांला मिळाले नाही. राज्य शासनाने आता तत्काळ दुष्काळ घोषणा करून तसा निर्णय घ्यावा. तसेच शेतकर्यांची कर्जमाफी करावी, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.