आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी (ता.अंबड) येथे बेमुदत उपोषणास बसलेल्या मराठा तरुणांचे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करुन काल चिरडले. त्यावर विरोधी पक्षांनी हल्लाबोल सुरु केला आहे. दुसरीकडे एरव्ही विरोधकांवर तुटून पडणाऱ्या भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ या घटनेवर, मात्र काहीशा बचावाच्या पवित्र्यात गेल्या आहेत. विरोधी पक्ष या घटनेचे राजकारण करीत असल्याचा कांगावा त्यांनी केलाय.आंदोलकांचा जीव वाचविण्याचा पोलिसांचा उद्देश होता, असे तर्कट त्यांनी महिला, मुले, ज्येष्ठांनाही रक्तबंबाळ करणाऱ्या कालच्या सराटीतील लाठीचार्जवर दिले आहे. तसेच मराठा आंदोलनकर्ते आणि पोलिसांत झटापट झाली, असा दावाही त्यांनी घटनास्थळी न जाताच केला आहे.
परवा व काल मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर व त्यात सहभागी राजकीय पक्षांचे नेते व त्यातही शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर तुटून पडलेल्या वाघांची कालच्या घटनेवर, मात्र शेळी झाल्याचे दिसून आले आहे. ही घटना दुर्दैवी आहे, एवढेच त्यांनी म्हटले आहे. मात्र, तिचा निषेध केलेला नाही.कालच्या प्रकारात पोलिसांवरही हल्ला झाला असून, यात १२ पेक्षा अधिक पोलिस जखमी झाल्याचे सांगत वाघांनी एकप्रकारे राज्य सरकारचीच बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच समाजात तणाव निर्माण होत असताना त्यांचं विरोधकांकडून जे खालच्या दर्जाचं चुकीचं राजकारण केलं जातं आहे, असा आरोप करीत कुठल्या गोष्टीचं राजकारण करावं याचं तारतम्य त्यांनी ठेवायला हवं, राजकारण करण्याची ही वेळ नाही, असा उपदेशाचा डोसही पाजला आहे. एखाद्या समाजाचं कल्याण हा कुणाच्याही राजकारणाचा विषय होऊ नये, एवढी प्रगल्भता विरोधकांकडून अपेक्षित आहे. त्यामुळे जालन्यातल्या दुर्दैवी घटनेचा वापर करून स्वतःची पोळी शेकण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये, असेही त्या म्हणाल्या.