उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा दावा स्वराज्य संघटनेचे संस्थापक तजा माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. सत्ताधारी भाजपसोबत आलेले राष्ट्रवादीचे 9 आमदार पुन्हा शरद पवार यांना जावून मिळतील, असेही ते म्हणालेत. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा तापले आहे.
काय म्हणाले संभाजीराजे?
छत्रपती संभाजीराजे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील. अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाणार नाही. हे मी चॅलेंज देवून सांगोत. हे केवळ लोकसभा निवडणुकीसाठी जुळवलेले गणित आहे, असे संभाजीराजे म्हणाले. यावेळी त्यांनी तिन्ही सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार तरी कसे? असा सवालही उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे अजित पवारांसोबत गेलेले 9 मंत्री आणि अन्य आमदार पुन्हा मोठ्या साहेबांकडे अर्थात शरद पवारांकडे परत जातील, असा दावाही छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी केला.
अजित पवार ईडीच्या भीतीने गेले – वडेट्टीवार
दुसरीकडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार ईडीच्या भीतीमुळे सत्ताधाऱ्यांना जावून मिळाल्याची टीका केली आहे. अजित पवारांनी आपल्या बारामतीच्या सभेत मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो असतो असे विधान केले. यावरून ते आपली मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी भाजपसोबत गेले हे दिसते. पण ते खरे नाही. ते सत्तेसाठी नव्हे तर ईडीच्या भीतीमुळे गेलेत. हे महाराष्ट्रातील जनतेचा ठावूक असल्यामुळे आगामी निवडणुकांत त्याचे परिणाम दिसतील, असे ते म्हणाले.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचाही दावा केला. राष्ट्रवादी 100 टक्के फुटली आहे. 9 आमदार फुटल्यामुळे हे स्पष्ट होते. अजित पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदीचे गुणगान करण्याचा दृष्टांत 10 वर्षांपूर्वी का झाला नाही? आताच च का झाला, ते त्यांनाच माहीत, असे ते म्हणाले.