आम्ही ज्यांना नाग समजून त्यांची पुजा केली तेच उलटे होऊन आम्हाला डसले, या गद्दारांनी घात केला नसता तर महाराष्ट्र देशात नव्हे तर जगात पहिल्या क्रमांकावर आणला असता असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी ता. 27 हिंगोलीच्या सभेत व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्र व राज्यावर सडकून टीका केली.
येथील रामलिला मैदानावर आयोजित निर्धार सभेस माजी मंत्री आदित्य ठाकरे शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, सुभाष वानखेडे, जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात, माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा, जिल्हाध्यक्ष विनायक भिसे पाटील, संदेश देशमुख, माजी आमदार संतोष टारफे, राजेश पाटील गोरेगावकर उपस्थित होते
यावेळी ठाकरे म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांचे महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवित आहे. मात्र शासन आल्या दारी थापा मारतोय लय भारी अशी स्थिती सरकारची आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे अजून मिळाले नाहीत. नुकसान भरपाई मिळालेली नाही. केंद्र व राज्य सरकारी केवळ थापा मारत आहेत. आता गद्दारांची सुलतानी आली असून हे संकट मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. जे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे ते चिरडून टाकण्याचा सरकारचा उद्योग सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. एका अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी 25 हजार रुपये देण्याचा अहवाल सरकारला दिला. मात्र पैसे तर मिळालेच नाही उलट अधिकाऱ्याला स्वेच्छा सेवानिवृ्त्ती घ्यावी लागली ही शेतकऱ्याची बाजू घेण्याची भेट असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.
ठाकरे पुढे म्हणाले की, डबल इंजीन सरकारला अजित पवारांचा डबा लागला. आता मालगाडी करणार काय, इतर पक्षातील नेते तुम्ही पक्षात घेताय, तुमच्या पक्षात कर्तृत्ववान नेते नाहीत काय असा सवाल त्यांनी भाजपावर टीका करतांना उपस्थित केला. भाजपामध्ये मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर उपरे आणून बसविले जात असून त्यांची किव येत असल्याचे त्यांनी सांगितले. घर घर मोदी योजनेमध्ये केंद्राच्या योजना प्रत्येक घरी जाऊन सांगणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांनी त्याची सुरवात आपल्या घरापासून करावी म्हणजे योजना प्रत्येक घरी पोहोचल्या काय हे कळेल असेही त्यांनी सांगितले.
ठाकरे पुढे म्हणाले की, इंडिया ही देशभक्तांची एकजूट आहे. देशातील लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आल्यानंतर पंतप्रधानांनी आमची तुलना इंडियन मुजाहिदीन बरोबर केली. मग वर्ल्ड कपचा भारत पाकिस्तानचा सामना गुजरात मध्ये नरेंद्र मोदी स्टेडीयमवर कसा चालतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्हाला देशप्रेमाचे धडे शिकवू नका असे त्यांनी यावेळी ठणकावले.
ठाकरे पुढे म्हणाले की, केंद्र शासनाच्या सबका साथ सबका विकास हा नारा दिला, पण निवडणुक झाल्यानंतर सबको लाथ अन दोस्तांचा विकास हे उद्योग केले आहेत. भाजपाला आमची घराणेशाही संपवायची असेल तर आम्हालाही त्यांची मित्रशाही संपवायची आहे. भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा भाजपाला अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या रक्षाबंधन कार्यक्रमावर टिका करतांना ठाकरे म्हणाले की, गुजरातमधील बिल्कीस बानो तसेच मणिपुरमध्ये अत्याचार झालेल्या महिलांकडून राखी बांधून घ्यावी असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
ठाकरे पुढे म्हणाले की,आम्ही हिंदू आहोत, देेशद्रोह्यांच्या विरोध करतो. देशाच्या मुळावर आलेल्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे हे आमचे राष्ट्रीयत्व आहे. केंद्र सरकार कुरुलकरला फाशी देणार का सोडून देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बीआरएसने त्यांची भुमीका स्पष्ट करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरी टीका केली. माझे वडिल चोरले, पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला पण जनतारुपी श्रीराम माझ्या पाठीशी आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.