• Sat. Feb 7th, 2026

BJP सोबत तडजोडीला नकार देताच धाड, अनिल देशमुखांचा दावा

Byjantaadmin

Aug 21, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. त्यात आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरळ-सरळ भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपसोबत तडजोड करण्यासाठी माझ्यावरही दबाव होता. मात्र, मी तडजोड करण्यास नकार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली असल्याचे अनिल देशमुख म्हणाले आहेत. ते एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलत होते.

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाई बाबत माहिती देताना ते म्हणाले की, शरद पवार पुण्यातील कार्यक्रमात बोलले की, आमच्यातले नेते ईडीच्या भीतीने भाजपने गेले आहेत. त्यात माझ्याही नावाचा उल्लेख केला, ते खरे आहे. माझ्यावरही भाजपकडून तडजोड करण्यासाठी दबाव होता. मात्र, मी भाजपसोबत तडजोड करण्यास स्पष्टपणे नकार दिला. विशेष म्हणजे त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. मी तडजोड करण्यास तयार झालो असतो तर माझ्यावर धाड पडली नसती, असा आरोपही अनिल देशमुख यांनी केला आहे. परमबीर सिंह यांना माझ्यावर खोटे आरोप करण्यास भाग पाडले गेले असल्याचेही ते म्हणाले.

दिलीप वळसे पाटीलांवरही टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरही अनिल देशमुख यांनी भाष्य केले. दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना तारतम्य बाळगायला हवे, असे देखील अनिल देशमुख म्हणाले. शरद पवार यांना आजपर्यंत महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता आली नसल्याचे दिपीप वळसे पाटील यांनी म्हटले होते. वळसे पाटील यांना त्यांच्या जिल्ह्यातील लोकच धडा शिकवतील, असे देखील अनिल देशमुख म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *