• Sun. Aug 17th, 2025

…तर ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला जाण्याचा काही अर्थच नाही; आप प्रवक्त्याकडून काँग्रेसबाबत सूचक वक्तव्य

Byjantaadmin

Aug 16, 2023

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या  (India) आघाडीची एकजूट बांधण्याचा प्रयत्न होत आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षातील तणाव पुन्हा वाढला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेस प्रवक्त्यांकडून सातही जागा स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर आपने त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

No point of INDIA alliance if Congress has decided to contest alone in Delhi in Lok Sabha polls said AAP Congress Vs AAP : ...तर 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला जाण्याचा काही अर्थच नाही; आप प्रवक्त्याकडून काँग्रेसबाबत सूचक वक्तव्य

दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन, राहुल गांधी, के सी वेणुगोपाल आणि इतर ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून दिल्लीतील सातही लोकसभा जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय झाला असल्याचे वक्तव्य केले. या बैठकीत ‘आप’सोबत आघाडी करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले.

विरोधकांच्या आघाडीत बिघाडी?

दिल्लीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप असे तीन प्रमुख पक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीसंदर्भात एका व्यासपीठावर आलेल्या विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचाही समावेश आहे. अशा स्थितीत राजधानीतील सर्व जागांवर काँग्रेसने एकट्याने लढण्याचा घेतलेला निर्णय ‘इंडिया’ आघाडीला धक्का असू शकतो.

काँग्रेस नेत्यांनी काय म्हटले?

दिल्लीत आम आदमी पक्षासोबत आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर काँग्रेस नेते अनिल चौधरी म्हणाले की, काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून एकदिलाने लढणार आहे. आम आदमी पार्टी किंवा युतीबाबत आमची चर्चा झाली नाही. आमचा स्वतःचा मार्ग आहे. अरविंद केजरीवाल सरकारची धोरणे उघड करण्यासाठी आम्ही पोल खोल यात्रेतून सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. दारू घोटाळ्यापासून अनेक कारवाई आमच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला.

 

तर, काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी सांगितले की, आजच्या बैठकीत दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीला सात महिने शिल्लक असून कार्यकर्त्यांना सातही जागांची तयारी करण्याची सूचना देण्यात आली असल्याचे लांबा यांनी सांगितले.

…तर इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा अर्थ काय? ‘आप’चे प्रत्युत्तर

‘आप’चे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली काँग्रेसच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या भूमिकेवर आमचे केंद्रीय नेतृत्व यावर निर्णय घेईल. आपची राजकीय समिती आणि इंडिया आघाडीची एक बैठक होईल. त्यात पुढील निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

‘आप’ प्रवक्त्या प्रियांका कक्कड यांनी म्हटले की, दिल्लीमध्ये आघाडी होणार नसेल तर ‘इंडिया’ आघाडीत राहण्याचा काहीच अर्थ नाही. हा वेळेचा अपव्यय आहे. मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत सहभागी व्हायचे की नाही, याबाबत पक्ष नेतृत्व निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *