पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या निरीक्षक, पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये आढावा बैठक घेतली. जोपर्यंत मावळ आपला होत नाही, तोपर्यंत इथे येतच राहणार, असे सांगत कार्यकर्त्यांना हा मतदारसंघ जिंकण्यासाठी त्यांनी चार्ज केले. मावळ आपला असणार आहे, ‘समझनेवाले को इशारा काफी है’, असे सांगत त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच मावळात आव्हानच देऊन टाकले.६ ऑगस्टला काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षक नेमले आहेत. ते आपापल्या मतदारसंघाचा आढावा घेऊन पक्षश्रेष्ठींना अहवाल देणार आहेत. त्यानुसार पुणे आणि मावळची जबाबदारी देण्यात आलेल्या शिंदेनी काल मावळचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक सर्व्हेचे कल हे आपल्या बाजूने असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न केला.
मावळ पक्षाच खासदार नाही ही उणीव नाही, तर संधी आहे. कारण जिथे खासदार नसतो तेथे कार्यकर्ते जास्त असतात, असे त्या म्हणाल्या. मावळात पक्ष जिवंत ठेवल्याबद्दल त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानले. कार्यकर्त्यांमुळे नेते असतात, असे सांगत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढवला.
काँग्रेसमध्ये जी लोकशाही आहे, ती कुठल्या इतर पक्षात नाही, असे सांगत शिंदेंनी प्रतिस्पर्धी BJPसह मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही यावेळी लक्ष्य केलं. मतदारांचा कल हा काँग्रेसकडे आहे, असे सांगत महाराष्ट्रात काँग्रेस स्थिर सरकार देऊ शकते, असा दावा त्यांनी यावेळी केला.आम्हाला काँग्रेसलाच मत द्यायचं आहे, फक्त तुम्ही चांगला उमेदवार द्या, असं लोक येऊन सांगत आहेत, असं त्या म्हणाल्या. त्यासाठी आपल्याला महागाई, बेरोजगारी, मणिपूर आणि ‘भारत जोडो यात्रा’ हे मुद्दे घेऊन `घर टू घर`गेले पाहिजे, असा कानमंत्र त्यांनी दिला.`एनसीपी`चा मतदार हा पूर्वी CONGRESS चा होता. पण, पर्यायाअभावी तो त्यांच्याकडे गेला. मात्र, एनसीपीतील फुटीमुळे तो पुन्हा आपल्याकडे खेचता येईल, असे शिंदेंनी यावेळी सूचित केले. निवडणूक सर्व्हेचे कल आपल्या बाजूने असणे या संधीचे सोने करा, भले ती तारेवरची कसरत असेल, कारण भाजप निवडणुकीसाठी कायपण करते, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला.